बीडमधील परळ वैजनाथ येथे मन सुन्न करणारी घटना घडली आहे.
येथील एका मुलाने वडिलांना फोन केल्यानंतर जीवन संपवलं. चंद्रहार राजेभाऊ शिंदे, असं या तरुणाचे नाव आहे. नेहमी प्रमाणे आपल्या मुलाचा फोन कॉल राजेभाऊ शिंदे यांना यांच्या मोबाईलवर आला. मात्र यावेळी मुलाचा आवाज नेहमीसारखा नव्हता. नैराश्यात डुबलेल्या आणि हुंदका भरलेला वाटत होता. त्याच आवाजात त्याने आपल्या वडिलांना सांगितलं बाबा, हा माझा शेवटचा कॉल…., यापुढे तुम्हाला माझा फोन येणार नाही.
मुलाचे असं बोलणं ऐकून वडील राजेभाऊ काहीसे गोंधळले आणि आपल्या मुलाची शोधाशोध सुरू केली. गावाच्या एका शिवारातील एका लिंबाच्या जवळ त्यांना मुलगा दिसला. पण तो झाडाच्या फांदीला लटकलेला होता. आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहून राजेभाऊ यांच्या पायाखालची जमीन सरकली. आपण सर्व काही गमावल्याचं त्यांना वाटू लागलं. दरम्यान राजेभाऊ शिंदे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
चंद्रहार राजेभाऊ शिंदेसोबत नेमकं काय घडलं? त्याने का जीवन संपवलं?
हाती आलेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास चंद्रहारसोबत एक घटना घडली. या दिवशी करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात एका मुलीने सर्वांसमोर चंद्रहारला चापट मारली होती. लोकांसमोर मुलीने मारल्यामुळे चंद्रहारला अपमानित झाल्यासारखं वाटू लागलं. त्याच विचाराने तो नैराश्यात गेला. सर्वांसमोर अपमान झाल्याने हा मानसिक धक्का लागला होता.
याच मानसीक धक्क्यातून चंद्रहार याने आपल्या वडिलांना फोन कॉल केला. वडिलांना फोन करून हा माझा शेवटचा कॉल आहे.. यापुढे तुम्हाला माझा फोन येणार नाही असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर त्याने मौजे करेवाडी शिवारातील मुंगळ्याचा माळ येथे जाऊन लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान मुलीने मारल्यामुळे झालेल्या अपमानामुळे मुलाने नैराश्येतून जीवन संपविल्याची तक्रार चंद्रहारचे वडिल राजेभाऊ रामभाऊ शिंदे (रा. मोहा) यांनी पोलिसात दिली आहे. त्यानुसार संबंधित तरुणीवर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा. पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहीफळे पुढील तपास करत आहेत.



