नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. पुनर्परीक्षेबाबत केंद्र सरकार पूर्णपणे अलर्ट मोडमध्ये आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन परीक्षा सुरक्षित, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत शिक्षण मंत्रालय आणि NTA चे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते. परीक्षेपूर्वी कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरप्रकार होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा आणि संभाव्य त्रुटींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
टेलिग्राम चॅनलबाबत कठोर भूमिका
आज झालेल्या बैठकीत सरकारने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि बनावट माहितीवरही कठोर भूमिका घेतली आहे. मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत बनावट पेपर लीक, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्स आणि भीती निर्माण करणाऱ्या टेलिग्राम चॅनेल्सबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
परीक्षेपूर्वी टेलिग्राम चॅनेल सक्रिय होतात
परीक्षेपूर्वी अनेक टेलिग्राम चॅनेल अचानक सक्रिय होतात आणि बनावट पेपर लीक, क्लिकबेट मेसेजेस तसेच अप्रमाणित माहिती पसरवून विद्यार्थी आणि पालकांमध्ये घबराट निर्माण करतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक लिंक विद्यार्थ्यांना बनावट ग्रुप्स आणि ऑटोमेटेड बॉट्सकडे वळवत असल्याचेही निदर्शनास आले आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, काही संशयास्पद चॅनेल्स मर्यादित मोबाईल नंबरद्वारे चालवले जात असून, यामागे संघटित नेटवर्क कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

