Homeकोल्हापूरअमित शहांचा महत्त्वाकांक्षी ६०० कोटींचा प्रकल्प ‘जवाहर’ला; आवाडे पितापुत्रांच्या मुत्सद्देगिरीचे यश

अमित शहांचा महत्त्वाकांक्षी ६०० कोटींचा प्रकल्प ‘जवाहर’ला; आवाडे पितापुत्रांच्या मुत्सद्देगिरीचे यश

देशातील अग्रेसर सहकारी संस्थांच्या माध्यमातून शून्य कचरा संकल्पनेतून साखर कारखान्यातील कचऱ्यावर प्रक्रिया करणारा देशातील पहिला बहुराज्य सहकार तत्वावरील प्रकल्प कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सुरू करण्याचे निश्चित झाले. साखर कारखानदारीतील या चुरशीच्या स्पर्धेमध्ये जवाहर कारखान्याने बाजी मारली आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांचे प्रयत्न सार्थकी लागले.

 

जून महिन्यात इचलकरंजी येथे झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सुतोवाच केले होते. तीन महिन्यात या प्रकल्पाच्या दिशेने ठोस पावले पडतील असे आश्वासन दिले होते. मंत्र्यांचे आश्वासन ठरल्याबरहुकुम प्रत्यक्षात उतरते असे नाही. पण शहा या प्रकल्पाचा सातत्याने मागोवा घेत राहिले. शहा यांनी घोषणा केल्यानंतर पहिला मोठा प्रश्न निर्माण झाला तो जागेच्या शोधाचा. त्यासाठी शहा यांनी पाठवलेल्या एका विशेष पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सीमाभागातील काही कारखान्यांना भेटी दिल्या.

 

यामध्ये माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे अध्यक्ष असलेला हुपरी येथील जवाहर कारखाना, शिरोळचे शिंदेसेना समर्थक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा नरंदे येथील शरद कारखाना, आमदार अमल महाडिक यांचा कसबा बावडा – कोल्हापूर येथील छत्रपती राजाराम कारखाना, भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांचा कागल येथील छत्रपती शाहू कारखाना, याच तालुक्यातील मंडलिक हमीदवाडा हा शिंदेसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांचा कारखाना, कर्नाटकातील निपाणी येथील आमदार शशिकला जोल्ले यांचा हालसिद्धनाथ साखर कारखाना आदी ठिकाणी जागेची पाहणी करण्यात आली.

 

मात्र इतर कारखान्यांच्या ठिकाणी पुरेशी आणि सोयीची जागा उपलब्ध नसल्याचे या पथकाचे म्हणणे पडले. अखेर आवाडे जवाहर कारखान्याच्या कार्यस्थळावर ६०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या तांत्रिक पथकाने येऊन जागेची अंतिम पाहणी केली. त्यानंतर अमित शहा यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला. या प्रत्येक पातळीवर जवाहर कारखाना आणि आवाडे पितापुत्रांनी सकारात्मक सहकार्याची भूमिका घेतल्याचा संदेश पथकातील यंत्रणेद्वारे अमित शहा यांच्या पर्यंत पोहचत होता.

 

आता जवाहर कारखान्याच्या ४० एकर जागेत या प्रकल्पाचा पहिला टप्पा राबवला जाणार असून त्याचे यश पाहून पुढील विस्ताराचे नियोजन केले जाणार आहे. एका अर्थाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मनातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या कार्यस्थळी खेचून आणण्यात माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांना मोठे यश आले असून त्यांच्या मुत्सद्देगिरीची चर्चा होत आहे. देशात सहकार तत्वावरील या पहिल्या वाहिल्या प्रकल्पामुळे ग्रामीण परिसराला नवी दिशा मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -