कोरोनानंतर दोन वर्षांनी भरणाऱ्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या वतीने राज्यातून ४ हजार ४७०० बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. कोल्हापूर विभागातून ३०० बसेस सोडण्यात येणार आहेत. राज्य नियोजनाप्रमाणे ६ ते १४ जुलै या कालावधीत या बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी आगाराच्या पातळीवर नियोजनाची तयारी सुरू आहे.
दोन वर्षे कोरोनामुळे पंढरपूरची आषाढी वारी साधेपणाने साजरी करावी लागली. सध्या कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे निबंध शिथिल केल्याने पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या वतीने यावेळी जय्यत तयारी केली आहे.
कोल्हापूर विभागातून यापूर्वी आषाढी वारीसाठी २५० ते २७५ बसेस सोडल्या जात होत्या; पण यावर्षी वारकऱ्यांची संख्या आणि सध्या प्रवाशांकडून होत असलेली माहिती लक्षात घेता आणखी २५ ते ३० जादा बसेस सोडण्याचे नियोजन विभागाने केले आहे. पंढरपूरला आलेल्या बसेसची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी शहरात पाच ठिकाणी बसस्थानके उभी करण्यात आली आहेत. कोल्हापूरहून जाणाऱ्या भाविकांसाठी पांडुरंग बसस्थानकाचा वापर करता येणार आहे.