शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील वारणा नदीवरील कोकरुड ते रेठरेदरम्यानच्या बंधाऱ्याची भिंत कोसळली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने या पुलावरील वाहतूक बंद केली आहे.
कोकरुड येथे शेजारच्या शाहुवाडी तालुक्यातील अनेक गावातील नागरिक खरेदीसाठी, कामानिमित्त येत असतात. त्यांच्यासाठी कित्येक वर्षापासून हा कोकरुड ते रेठरे बंधारा पूल सोयीस्कर ठरला आहे. या बंधाऱ्याची भिंत कोसळली असून कोल्हापूर पाटबंधारे विभागाने या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. तरीही दुचाकीस्वार या धोकादायक पुलावरून जाण्याचे धाडस करीत आहेत.
या बंधाऱ्याची डागडुजीची व उंची वाढवण्याची मागणी नागरिकांची होती. मात्र या मागणीकडे पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले होते. पावसाळ्यात वारणा नदीचे पाणी वाढले की, या पुलावरील वाहतूक बंद होत होती. उन्हाळाभर हा पुल वाहतुकीसाठी खुला होत होता.
सध्या वाहतूक बंद करण्यात आलेल्या या पुलाच्या बांधकामाची मागणी होत आहे. पुलाची दुरुस्ती झाल्याशिवाय वाहतूक पूर्ववत होणे कठीण आहे. तरी लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.