कोल्हापुरातील (Kolhapur) पाटील-महाडिक (Patil-Mahadik Group) या बलाढ्य कुटुंबातील राजकीय संघर्षाचा गोंधळ नवरात्रीत नव्यानं पाहायला मिळत आहे.
गोकुळ दूध संघानंतर आता राजाराम साखर कारखाना या महाडिक यांच्या ताब्यात असलेल्या अखेरच्या सत्ताकेंद्रावरुन दोन्ही घराण्यातील संघर्ष शिगेला पोहोचलाय.
आज शुक्रवारी होणारी राजारामची वार्षिक सभा ही महाडिक यांची शेवटची सभा असेल, अशा शब्दात सतेज पाटील यांनी आव्हान दिलं आहे. तर, माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी राजाराम कारखाना (Rajaram Factory) योग्य लोकांच्या हातात असल्याने सभासद पुन्हा एकदा निवडणुकीत विरोधकांना जागा दाखवून देतील, असं प्रत्युत्तर दिलं आहे. या सभेच्या निमित्तानं प्रथमच सतेज पाटील (Satej Patil) व अमल महाडिक असा दोन घराण्यातील संघर्ष सुरु झाला आहे.
या सभेदरम्यान, सतेज पाटील-महाडिक गट आमनेसामने आल्याने दोन्ही गटांत बाचाबाची झाली. पोलिसांना मध्यस्थी करत हा वाद मिटवावा लागला आहे. सध्या सभेच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा वाद का झाला याबाबतची माहिती मिळू शकली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील आणि महाडिक परिवार यांच्यातील राजकीय संघर्ष सातत्यानं सुरू असतो. यापूर्वी राजकीय आखाड्यात हा सामना अनेकदा झाला आहे. आता तर तो सहकाराच्या मैदानातही वाद गाजत आहे.