शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. केंद्रात भाजपसोबत आल्या नंतर शिंदे गटाला मोदी सरकार पहिलं गिफ्ट (gift) दिलं आहे. संसदेच्या स्थायी समितीच्या बदलांमध्ये शिंदे गटाला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. माहिती-तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे देण्यात आले आहे.
बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सामील झाले. शिंदे गटात सामील झाल्यानंतर प्रतापराव जाधव यांनी थेट ठाकरे यांना टार्गेट करत 100 खोके मातोश्री ok असं म्हणत खळबळ माजवून दिली होती. त्यामध्ये खासदार जाधव हे राज्यभर चर्चेत आले होते.
एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू असलेले प्रतापराव यांना आता भाजपकडून मोदी सरकार मध्ये पहिलं गिफ्ट (gift) देण्यात आलं. माहिती-तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद कायम चर्चेत असलेले समितीचे अध्यक्षपद प्रतापराव जाधव यांना देण्यात आलं आहे. याआधी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याकडे हा पदभार होता. मात्र आता मोदी सरकारने बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर ती जबाबदारी दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही बड्या नेत्यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे दोन वेगवेगळ्या मैदानावर दसरा मेळावे पार पडले. एकनाथ शिंदे यांच्या भाषणाआधी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना कटप्पा असा उल्लेख केला होता. त्यांच्या याच टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. “ते भाषणात मला कटप्पा म्हणाले. अरे कटप्पा पण स्वाभिमानी आणि प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. आणखी काय म्हणालात? शिवसैनिकांना त्रास देताय? अरे असं बोगस काम आम्ही करणार नाहीत. आम्ही समोरुन वार करणारे आहोत. तुमच्यासारखे पाठीत खंजीर खुपसणारे नाहीत”, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं.
“तुम्ही तर तुमच्या उघड्या डोळ्यांनी आमचे शिवसैनिक जेलमध्ये गेले, तडीपार झाले, त्यांच्यावर मोक्का लागले, आनंद पवार अक्षरश: ढळाढळा रडले. त्यांचे अश्रू तुम्हाला नाही दिसले? आम्हाला काय सांगता? हे सरकार कुणावही अन्याय करणार नाही. मी जाहीरपणे पोलिसांना सांगू इच्छितो, आम्हाला कुणावरही अशाप्रकारचा अन्याय करुन पक्षामध्ये सामील करुन घ्यायचं नाही. आज एवढा लाखो लोकांचा जनसमुदाय हा साक्षी आहे. कोणी चूक केली आणि कोण बरोबर आहे, असले धंदे तुम्ही केले, आम्ही नाही करणार”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.




