कांद्याची आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. सध्या दिल्लीत कांद्याचे दर ६० ते ७० रुपयांवर असून ते शंभरी गाठतील अशी शक्यता भाजीविक्रेत्यांनी व्यक्त केलीय. दिल्लीत आज कांद्याचे पाच किलोचे दर ३५० रुपयांवर आहेत. काल ३०० रुपये इतके होते. तर त्याआधी २०० रुपये ५ किलो दराने विक्री होत होती. आठवड्यापूर्वी २००, १६० रुपये असा दर होता. गेल्या आठवड्यातच दर वाढले. कांद्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं.
कांद्याच्या दराने दिल्लीत सत्तरी पार केलीय. भाजीविक्रेत्यांनी सांगितले की, नवरात्रीच्या आधी कांद्याचे दर ५० रुपये प्रतिकिलो इतके होते. आता ७० रुपये किलो असे झाले आहेत. मार्केटमध्ये कांदा ७० रुपये किलो दराने मिळाला तर आम्ही ८० रुपये किलो दराने विक्री करणार, याआधी कांद्याचे दर ३०-४० रुपये प्रति किलो इतके होते अशी माहितीही विक्रेत्यांनी दिली.
इतर भाजीपाल्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याशिवाय टोमॅटोचेही दर वाढले आहेत. टोमॅटो याआधी २० रुपये किलो इतका होता. आता ४० ते ४५ रुपये किलोवर पोहोचला आहे. टोमॅटोचे दरही ७० रुपये किलो पर्यंत जातील असा अंदाज भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केलाय.
लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या कमीतकमी भावात 299 तर सरासरी भावता क्विंटल मागे 375 रुपयांची घसरण झाली आहे काल ज्या कांद्याला प्रति क्विंटल कमीतकमी 2300 रुपये आणि सरासरी 5300 रुपये मिळत होता आज त्याच कांद्याला कमीतकमी 2001 तर सरासरी 4925 इतका भाव मिळत आहे.आवक चांगली होऊन देखील सरासरी भावात अचानक क्विंटल मागे 375 रुपयाची घसरण झाल्याचे पाहून शेतकऱ्यांना धक्का बसला असला तरी पुन्हा भाव वाढतील अशी त्यांना आशा आहे




