ताजी बातमी/ ऑनलाईन
टीम वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे मोठे सावट दिवाळी सारख्या मोठ्या सणात दाटून आले आहेत. त्यामुळे कापड उत्पादनात मोठी घट होत आहे. मंदीचे वातावरण यामुळे ‘ मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योगांवर विपरीत परिणाम झाला आहे. यंत्रमागावरील कापड उत्पादनामध्ये ३५ ते ४० टक्के घट झाली आहे.
तयार कपडे बनवणारे (गारमेंट) उद्योग बंद पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, अक्षरशः विकलेल्या कापडाचे पैसे मिळण्यास चार-चार महिने वाट पाहत राहावे लागत आहे. इचलकरंजी हे शटललेस मागाचे ( १४,५०० संख्या ) देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे केंद्र बनले आहे. आधुनिकीकरणाचा मार्ग चोखाळलेल्या इचलकरंजीतील या वस्त्र उद्योगाला मंदीने जर्जर केले आहे. साध्या मागावर सरासरी ७० ते १०० मीटर साधेभरडे कापड विणले जात असताना एअरजेटवर दररोज ८०० ते हजार मीटर गुणवत्तापूर्ण कापडाचे उत्पादन होते.
गेल्या काही महिन्यांपासून कापडाला मागणी नसल्याने उत्पादन सुमारे ४० टक्क्यांनी घटले आहे. कापड विणून घेण्याच्या मजुरीचा दर ५२ पिकाला १६ पैशांवरून ८- १० पैसे इतके घसरले आहे. साध्या मागाच्या कापड विणण्याचा दर १० पैशांवरून ६-७ पैशांवर घटला आहे. शिवाय विकलेल्या कापडाचे ३० दिवसांत पैसे आलेच पाहिजेत, असे ठरविण्यात आले होते. हा कालावधी वाढत जाऊन आता तो चार महिन्यांवर गेला आहे.
मजुरीचे दर १५ ते २० टक्के कमी झाले आहेत. खेरीज, अहमदाबाद, सुरत, पाली, बालोतरा, सिल्वासा, वापी अशा परराज्यातील केंद्रांत माल प्रक्रियेसाठी नेण्याची भीती दाखवून दर आणखी कमी केला जात असल्याने व्यावसायिकांची आर्थिक कुचंबणा होत चालली आहे.





