राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगाराच्या वतीने शनिवार (६ जून) पासून इचलकरंजी-कोल्हापूर या मार्गावर वातानुकुलीत ई बससेवा सुरु करण्यात आली आहे. ही बस विनाथांवा-विनावाहक असणार आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिली.
इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर यापूर्वी विना वाहक-विना थांबा बस फेऱ्या सुरु होत्या. त्याला प्रवाशांकडून उदंड असा प्रतिसाद लाभत होता. परंतु काही कारणास्तव या फेऱ्या थांबविल्या गेल्या. आता एस. टी. महामंडळाच्या ताफ्यात नव्या ई बसेसचा समावेश करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने इचलकरंजी-कोल्हापूर
मार्गावर वातानुकुलित विना थांबा-विना वाहक बस सेवा सुरु करण्यात आली आहे. इचलकरंजीहून कोल्हापूरला सकाळी ७वाजल्यापासून रात्री १०.४५ वाजेपर्यंत ३० फेऱ्या असतील. तर
कोल्हापूरहून इचलकरंजीला सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९.२० पर्यंत २८ फेऱ्या असतील.
यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत नागरिक आदींना राज्य परिवहनच्या सर्व सवलती दिल्या जाणार आहेत. या बातानुकुलित बससेवेचा इचलकरंजी शहर व परिसरातील प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सागर पाटील यांनी केले आहे.





