महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ निकालानंतर १५ व्या विधानसभेमध्ये शिवसेना (शिंदे गट) विधिमंडळ पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक, आज मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये पार पडली. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्देशानुसार शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदेजी यांच्या अध्यक्षतेत ही शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत 4 ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये सर्वात महत्त्वाचा ठराव म्हणजे एकनाथ शिंदे यांना गटनेता ठरवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मंत्री उदय सामंत यांनी शिंदे यांच्या गटनेतापदी नियुक्ती व्हावी, असा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शिंदे गटाकडून याबाबत अधिकृतपणे प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.
ठराव क्र १ – महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचे आभार
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेसाठीच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं मतांचं भरभरुन दान शिवसेनेच्या आणि महायुतीच्या पदरात टाकलं. ज्या हिरीरीने आणि उमेदीने मतदारांनी निर्विवाद आणि सुस्पष्ट कौल दिला, त्याला राज्याच्या राजकीय इतिहासात तोड नाही. असा ऐतिहासिक विजय कुठल्याही पक्षाला आजवर मिळाला नाही, ते यश आई भवानीच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला प्राप्त झालं. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न खऱ्या अर्थानं जनतेनंच पूर्ण करुन दिलंय. रयतेचं लोककल्याणकारी राज्य साकारण्याचं शिवधनुष्य मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी यशस्वीरित्या पेललं. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांची त्यांना समर्थ साथ लाभली. महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेनं जो उदंड प्रतिसाद दिला, त्यासाठी जनतेच्या आभाराचा ठराव येथे मांडत आहोत.
कुठल्याही सरकारच्या कल्याणकारी राजवटीचा लाभ सर्वप्रथम जनतेलाच मिळायला हवा, याची जाणीव ठेवून शिंदे सरकारनं ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, लाडका भाऊ, लाडके शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नवनवीन योजना कार्यान्वित केल्या. सर्वसामान्य जनतेच्या खात्यात थेट लाभ पोहोचवणाऱ्या शिंदे सरकारला जनतेनं मुक्त हस्ते शाबासकी दिली. या कल्याणकारी योजनांसोबत विकास कामांनाही सरकारने प्राधान्य दिले.
महाराष्ट्राच्या जनतेच्या या निर्भेळ कौलामुळे आमच्यावरील जबाबदारी आणखीनच वाढली आहे. आता आणखी दुप्पट जोमानं काम करण्यासाठी आम्ही सारे कटिबध्द आहोत. महाराष्ट्रासाठी स्थैर्य, विकास आणि जनकल्याणाची निवड करणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्यासाठी हा ठराव मांडण्यात येत आहे. सूचक – श्री गुलाबराव पाटील
अनुमोदक -श्री शंभूराज देसाई
ठराव सर्वानुमते मान्य
ठराव – २) पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचे अभिनंदन
खोटारडेपणा, अहंकारचा पराभव करुन महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला महाकौल दिला आहे. या भव्य विजयाचे प्रमुख शिल्पकार, महायुतीचे मार्गदर्शक आणि आमचे प्रेरणास्थान पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांचे आम्ही या दणदणीत विजयाबद्दल त्रिवार अभिनंदन करतो. महायुतीचे एक प्रमुख रणनितीकार, तसेच भारताचे कणखर गृहमंत्री श्री अमितभाई शहा यांचेही महाराष्ट्रातील महाविजयाबद्दल हार्दिक अभिनंदन.
हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार खऱ्या अर्थाने आदरणीय मोदीजीच पुढे नेत आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात झंझावाती दौरे केला. आपल्या भाषणातून अवघ्या महाराष्ट्रात विचारांचा अंगार फुलवला. जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्या पलिकडे आपण गेलो तरच देशाची प्रगती होईल असा संदेश त्यांनी आपल्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणांमधून दिला. विरोधकांनी त्यांच्या या घोषणांचा चुकीचा अर्थ काढून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु सामान्य जनेतेला मोदीजींच्या भाषणाचा खरा अर्थ कळला. त्यामुळेच ते मोदीजींच्या आणि महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. शिवसेनेचे सर्व आमदार, सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी आणि लाखो पाठीराखांच्या वतीने आम्ही पंतप्रधानांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा आणि देशाचा विकास याच गतीने होऊन राज्य प्रगतीची एक नवी उंची गाठेल असा आम्हाला विश्वास आहे.
महायुतीमधील तिन्ही पक्षांत सूसंवाद राखण्यात, जागावाटपापासून ते प्रचारसंभांपर्यंत सगळीकडे योग्य समन्वय राखण्यात अमितभाईं शाह यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक होती. महायुतीमधील प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेता आणि प्रत्येक कार्यकर्ता अमितभाईंच्या मार्गदर्शनाखाली एका निश्चित ध्येयासाठी अखंड काम करत होता. अमितभाईंनी आपल्या भाषणातून महाआघाडीचा कार्यक्रम, गेल्या अडिच वर्षात महायुती सरकारने केलेली कामे प्रभावी रितीने जनतेपर्यंत पोहोचवली, त्यामुळेच हा प्रचंड असा विजय साध्य झाला. महायुतीच्या पारड्यात मतांचे भरभक्कम दान पडले.
या ऐतिहासिक विजयाबद्दल देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शहांचे महाराष्ट्रातील जनतेच्या तसेच शिवसेनेच्यावतीने अभिनंदनाचा ठराव मांडण्यात येत आहे.
सूचक – दादा भुसे
अनुमोदक – भारत गोगावले
ठराव एकमताने मान्य
ठराव क्र – ३) अभिनंदनाचा ठराव : श्री. एकनाथ शिंदे :