कोल्हापूर (Kolhapur News) फुटबॉलला (Football News) हुल्लडबाजीचे ग्रहण यंदा देखील कायम असून कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट लागले आहे. फुटबॉल पंढरी असलेल्या कोल्हापुरातील मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळ या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये ही हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
हाणामारीनंतर मैदानात एकच गर्दी उसळल्याने गर्दी पंगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. रविवारी उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ही फ्री स्टाईल हाणामारीची घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे कोल्हापूर फुटबाॅल वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
दरम्यान, या संपूर्ण राड्याचा फुटेज आता पुढे आला असून या फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहे. नेमकी हाणामारी कशा मुळे झाली हे अद्याप कळू शकले नाहीये. मात्र पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळ या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील सामन्यामध्ये दोन्ही संघांतील खेळाडूंनी धुसमुसळा खेळ करत असताना अचानक मैदानावर मारामारीची घटना घडल्याने फुटबाॅल वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
यानंतर समर्थकांमध्येही राडा झाला. त्यामुळे हुल्लडबाज समर्थकांवर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे पोलिसांनी मैदानावरील तणाव आणि हुल्लडबाजीची दखल घेत पोलीस पुढील कारवाई करत आहे.
कोल्हापूर फुटबॉलला हुल्लडबाजीचे ग्रहण कायम!
फुटबाॅलची पंढरी अशी कोल्हापूरची आगळी वेगळी ओळख आहे. शिवाय कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाला जवळपास 90 वर्षाहून अधिकची ऐतिहासिक आणि देदीप्यमान परंपरा लाभली आहे. या खेळाला राजाश्रय देण्याचे काम लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी केलंय. राज्यातून उमदा खेळाडू निर्माण व्हावे आणि जागतिक पातळीवर देशाचा लौकिक वाढावा सोबतच क्रीडा संस्कृति जोपासली जावी ही त्या मागची मनीषा होती. मात्र अलिकडे मैदानातील मारामारी हे कोल्हापूरच्या फुटबॉलला लागलेलं ग्रहण आहे, असेच खेदाने म्हणावे लागत आहे. त्याला कारण ही अगदी तसेच आहे.
गेल्या काही वर्षभरात अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. स्टेडियममध्ये चाहत्यांमधील इर्ष्येतून एकमेकांची आई बहिण काढून शिव्या देणे, लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे आदी प्रकार सर्रास होत असल्याने कोल्हापूरच्या फुटबॉलला हिंसक वळण लागत आहे. त्यामुळे याबद्दल मंडळांनी तसेच प्रतिष्ठित शहरातील तालीम आहेत त्यांनी याच्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. असे मत आता क्रीडा क्षेत्रातून व्यक्त केलं जातंय