बहिणीकडे पाहुणी म्हणून आलेल्या महिलेचा कपडे वाळत घालताना विद्युत तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी(ता.१२)सायंकाळी तालुक्यातील पांजरी(मोंढा) शिवारातील हिरणवार यांच्या शेतात घडली.
पार्वती किशोर खासदार (वय ४१, कान्हापूर, ता. सेलू, जि. वर्धा) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून ती पती व दोन मुलांसह ९ मे रोजी सातनवरी नागपूर येथे भाच्याच्या लग्नासाठी आली होती. लग्न आटोपल्यावर सोमवारी सकाळी पाहुणचारासाठी बहीण व भाऊजी हनुमंतराव डोळसकर(रा. पांजरी मोंढा) यांच्याकडे पाहुणी आली होती. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कपडे धुतल्यानंतर ते वाळत घालण्यासाठी गेली असता तिथे असलेल्या वायरमध्ये उघडे पडलेले तिला दिसले नाही.
त्या वायरचा स्पर्श होताच विजेच्या धक्क्याने ती खाली पडली. बेशुद्ध अवस्थेत लागलीच तिला हिंगण्याच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनी तिला वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. हिंगणा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून ठाणेदार जितेंद्र बोबडे पुढील तपास करीत आहेत.