पावसाने जिल्ह्यात दोन दिवस विश्रांती घेतली असली तरी धरण क्षेत्रात पाऊस झाला आहे. त्यामुळे राधानगरी धरणातून १९ हजार ९६९ इतका विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी २४ तासांत २५ फुटांपर्यंत गेली आहे.
जिल्ह्यातील १७ बंधारे पाण्याखाली आहेत.
कृष्णा आणि घटप्रभा नदीतून होणारा विसर्ग लक्षात घेऊन आलमट्टी धरणातूनही अधिक विसर्ग करण्यात आला आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत धरणातून ५० हजार क्युसेक पाणी सोडले होते. त्यानंतर विसर्ग ७० हजार क्युसेक करण्यात आला. त्यामुळे आलमट्टी धरणाच्या पुढील क्षेत्राला सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला आज (ता.१९) हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांत पावसाचे दमदार हजेरी लावली. शहरासह सर्वच भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. दोन दिवस मात्र पावसाने विश्रांती घेतली. किरकोळ सरींचा अपवाद वगळता जिल्ह्यात फारसा पाऊस झाला नाही. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी सातत्य होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. पावसाळ्यातील पुढील दिवस लक्षात घेऊन राधानगरी आणि कुंभी धरणातून सातत्याने विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी २४ तासांत २५ फुटांवर स्थिर आहे. आलमट्टी धरणातही कृष्णा आणि घटप्रभा नदीत होणाऱ्या विसर्गाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने त्यांनी पाण्याचा विसर्ग वाढवला आहे.
जून महिन्यात होत असलेल्या संततधार पावासाने धरण क्षेत्राबरोबर शेतजमिनीतही पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यामुळे यापुढे पडणाऱ्या पावसाचे पाणी थेट नदीमध्ये प्रवाहित होत राहणार आहे. जुलै, ॲागस्ट व सप्टेंबर महिन्यांतील हवामान खात्याकडून पावसाच्या अंदाजाची माहिती घेऊन १५ ॲागस्टपर्यंत अालमट्टी धरणातील पाणीसाठा ५१५ मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याबाबत कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली.
जागतिक बॅंकेने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील पूर नियंत्रणासाठी मंजूर झालेल्या निधीतून पायाभूत कामे प्राधान्याने करण्यात यावीत. संभाव्य महापुराच्या नियंत्रण व उपाययोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी राजू शेट्टी यांनी आलमट्टी धरणातील पाणीसाठा वाढत गेल्यास हिप्परगी धरणातील बॅकवॉटर नृसिंहवाडीपर्यंत येते. ऐन पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सह्याद्री घाटमाथ्यावरून वेगाने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहास अडथळे निर्माण होऊन सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील महापुराचा प्रश्न गंभीर होणार आहे.
यामुळे प्रशासनाकडून कर्नाटक सरकारशी संवाद साधून १५ ॲागस्टपर्यंत आलमट्टी धरणाची पाणीपातळी ५१५ मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याबाबत मागणी केली.
राज्य सरकारने जागतिक बॅंकेच्या सहकार्याने होत असलेले पूर नियंत्रणासाठीचा संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी. या निधीमधून प्राधान्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील तसेच कर्नाटक सीमाभागातील कृष्णा, पंचगंगा व वारणा नद्यांच्या पूर नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांवर पहिल्यांदा निधी खर्च करण्याची मागणी करण्यात आली.