राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे चित्र बघायला मिळाले. कालही सर्वदूरपर्यंत पाऊस होता. आज पावसाचा जोर ओसरताना दिसतोय. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ परिसरात पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील काही भागांमध्ये म्हणावा तसा पाऊस अजूनही झाला नसल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. भारतीय हवामान विभागाने काल अनेक भागांमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट दिला होता.
हवामान खात्याकडून ऑरेंज आणि येलो अलर्ट
आज देखील हवामान खात्याकडून काही भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला. कोकण, विदर्भामध्ये आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. काल झालेल्या पावसामुळे अनेक शहरांमधील रस्त्यावर पाणी साचले. रविवारी सकाळीच पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळाले आणि साधारपणे कमी जास्त करत 24 तास पाऊस अनेक भागांमध्ये होता.
पुण्यातील धरण क्षेत्रात जोरदार पावसाची हजेरी
भारतीय हवामान खात्याकडून कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला. पुणे विभागातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे. कोकणातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मुंबई आणि पुण्यातही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला नाहीये.
काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम
पुढील दोन दिवसात हवामानात फारसा बदल होणार नसल्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. घाट विभागात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
भारतीय हवामान खात्याकडून महत्वाचा इशारा
दरवर्षीपेक्षा यावेळी राज्यात मॉन्सून लवकरच दाखल झाला. सध्या वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस सुरू आहे. फक्त राज्यच नाही तर देशातील अनेक भागांमध्ये दमदार पाऊस सुरू असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. राज्यात यंदा पाऊस चांगला राहण्याची शक्यता देखील आहे.
घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस
ताम्हिणी घाट परिसरात 280 मिमी नोंद झालीये. सलग तिसऱ्या दिवशी पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घटमाथ्यावर मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला. गेल्या 24 तासात ताम्हीणी घाट परिसरात सर्वाधिक 280 मिमी पावसाची नोंद झालीय, तर दावडी येथे 223 मिमी पाऊस झालाय.
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस
गोंदिया जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 5 घरांची पूर्णता तर 364 घरांच अंशतः नुकसान झाले. जनावरांच्या 135 गोठ्यांचेही नुकसान. पंढरपूर उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदीला पूर आला. उजनी आणि वीर धरणातून 60000 क्यूसेक इतके पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात आले असल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे.
खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला जाणार
खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे. 18 हजर क्यूसेक्स वेगाने सुरु असलेला विसर्ग 8 वाजल्यापासून 22 हजार क्यूसेक्सने केला जाणार आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा आला आहे.पुणे शहरासह उपनगरात हलक्या पावसाच्या सरी. पुणे शहरासह उपनगरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे.