आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाच्या निरोपाला पावसाची साथ मिळणार आहे. मुंबईत यलो अलर्ट तर रायगड, नाशिक घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबईत आज (६ सप्टेंबर) दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
मुंबईतील हवामान अंदाज
पुढील ४८ तासांत अधूनमधून मुसळधार पावसाची शक्यता
ढगाळ वातावरण, दमट व चिकट हवामान राहील
उद्या (७ सप्टेंबर) पासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता, तर ९-१० सप्टेंबरला हलक्या सरी बरसतील
पावसाची स्थिती
मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण : मुसळधार पावसाचा अंदाज (ऑरेंज अलर्ट)
उर्वरित कोकण व मध्य महाराष्ट्र : तुरळक ठिकाणी जोरदार सरी (यलो अलर्ट)
पश्चिम मध्य प्रदेश व पूर्व राजस्थान परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र अजून तीव्र होत असून, त्यामुळे पुढील काही दिवस हवामान पावसाळी राहणार आहे.
कोकणात अलर्ट
रायगडमध्ये काही भागात अति मुसळधार पाऊस – ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता – यलो अलर्ट
आजचा अंदाज
पालघर, नंदूरबार, धुळे, नाशिक घाटमाथा – मुसळधार पाऊस (ऑरेंज अलर्ट)
मुंबई, ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक, पुणे घाटमाथा – जोरदार पाऊस (यलो अलर्ट)
उर्वरित महाराष्ट्र – हलक्या सरी, काही ठिकाणी पावसाची उघडीप राहील
अनंत चतुर्दशीला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची साथ मिळणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पावसामुळे थोडी गैरसोय होऊ शकते. मात्र, पुढील आठवड्यात पावसाचा जोर ओसरून काहीसा दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांवर पाणी साचण्याची शक्यता आहे. निचऱ्याची व्यवस्था करून शेतात पाणी थांबू देऊ नका.
* सोयाबीन, मूग, उडीद यांसारख्या पिकांमध्ये पाणी थांबल्यास मुळे कुजू शकतात.