जिल्ह्यात रेशन कार्डवरील सुमारे 1 लाख 20 हजार नावे कमी होणार आहेत. राज्य शासनाच्या ‘मिशन सुधार’ योजनेंतर्गत संशयास्पद वाटणार्या 2 लाख 87 हजार नावांची यादी पुरवठा विभागाने केली आहे.
त्याची पडताळणी करून ही कारवाई करण्याची प्रक्रिया विभागाने सुरू केली आहे.
सलग 6 ते 12 महिने धान्यच नेले नाही
राज्यातून परराज्यात गेले आहेत
100 वर्षांवरील वय असणारे
18 वर्षांखालील एकाचेच नाव आहे
रेशनवरून प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत मोफत धान्य दिले जात आहे. मात्र, या धान्याचा अनेकांकडून गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. निकषात न बसणारेही अनेकजण या योजनेंतर्गत मोफत धान्याचा लाभ घेत आहेत. यामुळे अनेक गरजू आणि पात्र कार्डधारक धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ज्यांना गरज नाही, जे पात्र नाहीत, अशांचे धान्य कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून ‘मिशन सुधार’ या अंतर्गत अशा रेशन कार्डधारकांचा शोध घेतला जात आहे.
मयत रेशन कार्डधारकांची नावे होणार कमी
यूआयडी (आधार कार्ड) कडून आलेल्या यादीनुसार मयत रेशन कार्ड धारकांची यादी तालुकानिहाय प्राप्त झाली आहे. त्यानुसार त्यांची पडताळणी करून मयत असणार्या रेशन कार्डधारकांची नावे कमी केली जात आहे. जिल्ह्यात 3 लाख 88 हजार नागरिकांची ई-केवायसी अद्याप झालेली नाही. यापैकी सुमारे 1 लाख 20 हजार मयत असल्याची शक्यता आहे, त्यानुसार ही नावे कमी केली जात आहेत.
18 हजार 499 जणांचे धान्य बंद
जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात धान्य न नेलेले 8 हजार 555 कार्ड आढळून आले आहेत. या कार्डांवरील एकूण 18 हजार 499 लाभार्थ्यांची नावे (युनिट) प्राधान्य कुटुंब योजनेतून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे धान्य बंद झाले आहे.