उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर याचा परिणाम होणार नसून या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले.
निवडणूक काळात राज्याच्या प्रमुखपदावरील व्यक्तीचे निधन होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे अशा प्रकारे निवडणूक रद्द करण्याबाबत कोणताही स्पष्ट आदेश निवडणूक नियमांत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही, असे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले आहे.
निवडणूक प्रचार काळात एखाद्या उमेदवाराचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्या संबंधित मतदारसंघातील निवडणूक स्थगित करण्याची पूर्वी प्रथा होती. मात्र, कालांतराने यात बदल करून ही प्रथा रद्द करण्यात आली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने निवडणूक स्थगित होणार किंवा कसे, याबाबत जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
निवडणूक अधिनियमानुसार, मतदानासाठी निश्चित करण्यात आलेली तारीख राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगी शिवाय मतदानाच्या दिवसापूर्वीच्या सात दिवसांत बदलता येत नाही. मात्र, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मतदानाचा दिवस बदलणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकाऱ्याचे मत झाल्यास, राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांच्या अधीन राहून असा बदल करता येतो. त्याचबरोबर राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील शासकीय दुखवट्याचा कालावधी घोषित केलेला असेल आणि याच काळात मतदान होणार असेल, तर मतदानाच्या दिवसात बदल करता येऊ शकतो, अशी निवडणूक अधिनियमात तरतूद आहे.
मात्र, सार्वजनिक हिताला बाधा येईल अशी कोणतीही परिस्थिती सध्या नाही. तसेच, अजित पवार यांच्या निधनाने जाहीर केलेला तीन दिवसांच्या दुखवट्याचा कालावधी ३० जानेवारीला संपत आहे. त्यामुळे, या दोन्ही शक्यता नसल्याने निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
या संदर्भात निवडणूक आयोगातील सूत्रांना विचारले असता, अद्याप तरी असा कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच निवडणूक नियमांमध्ये अशी तरतूद नसल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या पातळीवर असा कोणताही निर्णय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे सांगण्यात आले.






