उत्तर मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून भाजप आणि मनसेला मोठा धक्का बसला आहे. विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी प्रकाश सुर्वे यांनी सर्व नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रवेशात उत्तर मुंबई भाजपचे महामंत्री शिवदया मिश्रा, मनसेच्या दहिसर उपविभाग अध्यक्षा कस्तुरी रोहेकर, उत्तर भारतीय मोर्चाचे उपाध्यक्ष राजेश मिश्रा, वॉर्ड क्रमांक १२ चे सचिव रवी फाटक, तसेच अमित पांडे आणि शशिकांत पाल यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले.
पक्षप्रवेशावेळी कस्तुरी रोहेकर यांनी मनसेवर गंभीर आरोप करत नाराजी व्यक्त केली. “पक्षात काम करूनही योग्य सन्मान मिळाला नाही. निवडणुकीच्या वेळी उमेदवारीसंदर्भात दबाव टाकण्यात आला. त्यामुळे काम करण्याची इच्छाच उरली नाही,” असे त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)
याशिवाय मनसेमध्ये जातीभेद होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. “स्थानिक पातळीवर काम करण्याऐवजी वरचे नेते केवळ सूचना देतात. इतर पक्षांत सहकार्य मिळते, मात्र येथे तसे होत नाही,” अशी टीकाही त्यांनी केली. (Maharashtra Politics)
मनसेच्या अंतर्गत कारभारावर नाराजी व्यक्त करत हा पक्ष पुढे जाऊ शकणार नाही, असा दावा रोहेकर यांनी केला. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे उत्तर मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


