‘अधिक मास’ हा ‘अधिक ज्येष्ठ’ महिना यावर्षी १७ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत असून, या काळात धार्मिक अनुष्ठाने आणि दानाचे विशेष महत्त्व आहे.
सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यांची सांगड घालण्यासाठी येणारा हा अतिरिक्त महिना भक्तांसाठी आध्यात्मिक प्रगतीची मोठी संधी मानला जातो.
या महिनाभरात तुम्हाला साखरपुडा करता येईल पण विवाह आवर्जुन टाळावा, असे शास्त्राने स्पष्ट केले आहे. सौर वर्ष ३६५ दिवसांचे असते, तर चांद्र वर्ष ३५४ दिवसांचे असते.
यातील ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी साधारणपणे दर २८ ते ३५ महिन्यांनी एक अधिक मास येतो. चांद्र महिन्यात सूर्याचे ज्या राशिसंक्रमण होत नाही, त्याला ‘अधिक मास’ किंवा ‘मलमास’ म्हणतात.
यंदा सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत संक्रमण न करता एकाच राशीत राहणार असल्याने ज्येष्ठ महिना ‘अधिक’ झाला आहे.यापूर्वी २०१८ मध्ये अधिक ज्येष्ठ महिना आला होता, तर यानंतर २०२९ मध्ये ‘अधिक चैत्र’ येणार असल्याचे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
काय करावे आणि काय टाळावे?
हे आवर्जून करावे
ग्रहण श्राद्ध, जातकर्म, नामकर्म, तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध, नित्यश्राद्ध करावेत.
तसेच साखरपुडा, बारसे, डोहाळे जेवण, जावळ, वाहन खरेदी, नवीन व्यवसाय, नवीन वस्तू खरेदी, लौकिक गृहप्रवेश करावेत.
हे आवर्जून टाळावे
शास्त्राने ज्या पद्धतीने काय करावे हे सांगितले आहे त्याप्रमाणेच काय करु नये हेही स्पष्ट केले आहेत.
गृहारंभ, वास्तूशांती, नूतन व्रत गृहण, विवाह, चौल, उपनयन, नवीन देव प्रतिष्ठा करु नयेत.
व्रतवैकल्ये आणि दान
या महिन्याची देवता भगवान श्रीकृष्ण (पुरुषोत्तम) असल्याने याला ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हणतात.
या काळात महिनाभर उपोषण, एकभुक्त राहणे किंवा मौन भोजन करण्याचे महत्त्व आहे.
विशेषतः ३३ अनारशांचे (अपूपदान) दान देण्याची पुरातन परंपरा आहे.
ज्यांना हे शक्य नाही, त्यांनी ३३ बत्ताशांचे दान द्यावे.
तांबूलदान, गंगास्नान आणि अखंड दीप प्रज्वलनाने लक्ष्मीप्राप्ती व सौभाग्य लाभते, अशी श्रद्धा आहे.





