मागच्या 26 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण अखेर सोनम वांगचूक यांनी मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. नड्डा यांच्या हातून ज्यूस पिऊन वांगचूक यांनी उपोषण सोडलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे. “गुन्हेगारांना पकडलं असून ते जेलमध्ये आहेत. गेल्या अडीच महिन्यात कठोर कारवाई केली आहे. पेपरफुटी विरोधात कायदा बनवणार” असं आश्वासन मोदी यांनी दिलं आहे. नीट पेपर लीक प्रकरणावरुन सध्या देशात मोठा गदारोळ सुरु आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. त्यात मोठ्या संख्येने तरुण वर्ग सहभागी झाला आहे. त्या शिवाय देशाच्या विविध भागात CJP च्या समर्थनार्थ आंदोलन सुरु आहे. जंतर-मंतरवरील आंदोलक आणि पोलिसांमध्ये अनेक हिंसक झडपा झाल्या आहेत.
जंतर-मंतरवर सुरु असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंह यांनी रात्री उशिरा गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात जाऊन सोनम वांगचूक यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर वांगचूक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. मागच्या 26 दिवसांपासून वांगचूक यांचं आमरण उपोषण सुरु होतं. बुधवारी विरोधी पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने वांगचूक यांची भेट घेतली होती. त्यांना उपोषण संपवण्याचं आवाहन केलं होतं.
सोनम वांगचूक उपोषण सोडल्यावर काय म्हणाले?
उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचूक यांनी एक्सवर पोस्ट केली. “आत्ताच मी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह आणि लेह-लडाखच्या शीर्ष संस्थांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत 26 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण सोडलं आहे. याआधी विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी मला भेटून किंवा पत्र लिहून उपोषण सोडण्याचा आग्रह केला होता. हे पाऊल अनेक अटी, दीर्घ चर्चा आणि देशातील संभाव्य हिंसाचार लक्षात घेऊन उचललं आहे. मी लवकरच एका व्हिडिओ पोस्ट करुन त्यात या अटींबद्दल विस्ताराने सांगणार आहे. मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की, तुम्ही सतर्क रहा आणि कुठलाही हिंसाचार नाही झाला पाहिजे”


