गणेशोत्सव आणि सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशात साखरेचा पुरवठा कमी झाल्यामुळे आणि किरकोळ किमतींमध्ये अचानक प्रचंड वाढ झाल्याने ऑनलाइन क्विक-कॉमर्स ॲप्ससह मोठ्या सुपरमार्केट्सनी साखर खरेदीवर मर्यादा घातली आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २६ जुलै रोजी ४८ रुपये प्रति किलो असलेली साखर २६ ऑगस्ट रोजी ६५.०५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. म्हणजेच फक्त ३० दिवसांत साखरेचे दर ३५.५% पेक्षा जास्त वाढले आहेत.
कोणत्या ॲप आणि स्टोअरवर किती मर्यादा?
साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्व ग्राहकांना साखर उपलब्ध व्हावी यासाठी विविध प्लॅटफॉर्म्सनी खालीलप्रमाणे मर्यादा निश्चित केली आहे-
ब्लिंकिट: एका वेळी जास्तीत जास्त ५ किलो.
स्विगी इन्स्टामार्ट: १-१ किलोचे २ पॅक किंवा ५ किलोचा १ पॅक.
बिगबास्केट: जास्तीत जास्त ६ किलो (वेगवेगळ्या ब्रँड्सचे).
डीमार्ट आणि रिलायन्स रिटेल: प्रत्येक ग्राहकासाठी जास्तीत जास्त २ ते ३ किलो.
१ महिन्यात कशी झाली दरवाढ?
२६ जुलै २०२६: ₹४८.०० प्रति किलो
२० ऑगस्ट २०२६: ₹५५.७० प्रति किलो
२६ ऑगस्ट २०२६: ₹६५.०५ प्रति किलो
घाऊक बाजारातही साखरेचे दर ४५ रुपये प्रति किलोवरून ६०.३६ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
साखरेचा तुटवडा आणि दरवाढीची ३ मुख्य कारणे
उत्पादनात घट: ‘इस्मा’ (ISMA) च्या अंदाजानुसार, २०२५-२६ च्या विपणन वर्षात देशाचे निव्वळ साखर उत्पादन सुमारे २७९ लाख टनांपर्यंत खाली येऊ शकते. २.
प्रचंड मागणी: भारतात साखरेचा वार्षिक खप २८० ते २८५ लाख टन आहे. खपाच्या तुलनेत नवीन उत्पादन कमी पडण्याची शक्यता असल्याने पुरवठ्यावर मोठा ताण आला आहे
कमी अंतिम साठा: सप्टेंबरच्या अखेरपर्यंत देशातील साखरेचा अंतिम साठा अवघा ३५ लाख टनांपर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सणासुदीत सामान्य कुटुंबांचे बजेट बिघडणार?
रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्री आणि दिवाळी या सणांच्या काळात मिठाईसाठी साखरेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. अशा वेळी साखरेच्या दरात प्रति किलो १७ रुपयांची वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे महिन्याचे रेशन बजेट कोलमडणार आहे.


