मंगळवारपासून महाराष्ट्रातील काही भागात 2.8 कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने लोडशेडिंग जाहीर केले आहे. पण याचा फटका या उन्हाळ्यात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला बसणार नसल्याचे देखील महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे॰
याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या ठिकाणी वीजचोरी, वीज वितरण हानी आणि बिलाची वसुली कमी आहे अशा ठिकाणी आम्ही लोडशेडिंग करू. यामध्ये G1, G2 आणि G3 श्रेणीतील ग्राहकांचा समावेश आहे, जे बहुतांशी मुंबई महानगर भागातील कल्याण भागात आहेत, भांडुप-मुलुंड, ठाणे आणि नवी मुंबई येथे महावितरणचे भारनियमन करणार नाही, कारण या भागात वीज वितरण चांगले आहे, तसेच इतर भागांच्या तुलनेत बिल वसुली देखील उत्तम आहे. लोडशेडिंगचा सामना विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांना करावा लागणार आहे. काही शहरी भागात, आम्ही वीज खंडित करत असलो, तरीही आम्ही ते दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवण्याची योजना आखत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान महावितरणचे एमडी विजय सिंघल म्हणाले, कोळशाच्या कमतरतेमुळे, पुरवठा या थर्मल स्टेशन्समधून 6,000 मेगावॅटने घट झाली आहे. दररोज सकाळी 6 ते सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत वीज वाचवण्याचे आम्ही ग्राहकांना आवाहन करतो.
हे लोडशेडिंग देशांतर्गत कोळशाच्या तुटवड्यामुळे विजेच्या पुरवठ्याच्या तुलनेत विजेच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाल्यामुळे केले जात आहे. आम्हाला वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी 2,500 ते 3,000 मेगावॅटचा तुटवडा जाणवत असल्यामुळेच आम्ही लोडशेडिंग करत आहोत. कोणताही पर्याय आमच्याकडे उरला नाही, तसेच आम्हाला ग्राहकांनी सहकार्य करावे, असे महावितरणच्या प्रवक्त्याने सांगितले.
महावितरणच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रातील अलीकडील वीजेची सर्वोच्च मागणी फेब्रुवारीमध्ये 26,000 मेगावॅटवरून एप्रिलमध्ये वाढून 28,000 मेगावॅटवर पोहोचली. आम्हाला भीती आहे की मागणी लवकरच 30,000MW वर पोहोचू शकते. आमच्याकडे 33,700MW साठी वीज खरेदीचे करार असले तरी, त्यापैकी 21,057MW (62%) औष्णिक वीज केंद्रातून राज्याच्या आत आणि बाहेर खरेदी केले जातात.