राज्यभरात पावसाचा जोर कमी झाला असून अधून मधून श्रावण सरी कोसळत (Weather Update) आहेत. मात्र कोकणासह मुंबईत जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान पुढच्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झाल्यानं राज्यात पावसाचा (Weather Update) जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात कोकणसह, पूर्व विदर्भ, उत्तर आि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मध्य महाराष्ट्रातील नगर, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यांत पावसाची उघडीप कायम होती. तर कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. गगणबावडा येथे मध्यम पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातही चार मंडळांमध्ये पावसाची भूरभूर सुरु होती. पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत पावसानं विश्रांती दिली. तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.





