महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
या मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ आज पुन्हा धडाडणार आहे. मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
राज ठाकरे कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार?
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा गटाध्यक्षांचा मेळावा महत्त्वाचा आहे. पण, सीमा वाद, राज्यपालांचे शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य यावर राज ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा महत्वाचा मानला जात आहे. यावेळी राज ठाकरे कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार, याचीही उत्सुकता आहे. दरम्यान, या मेळाव्यानंतर 29 नोव्हेंबरपासून राज ठाकरेंचा कोकण दौरा देखील सुरु होणार आहे.
राज ठाकरे यांची भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढली आहे. त्यातच राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यावर भाष्य करणार का, याचीही उत्सुकता आहे. राज्यातलं सध्याचे वातावरण, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या बद्दल केलेले वक्तव्य तसेच हर हर महादेव चित्रपटाचा वाद या मुद्यांवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.
मे महिन्यात राज ठाकरे यांनी औरंगाबादला शेवटची सभा घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा राज ठाकरेंची सभा होत आहे. औरंगाबादमधील सभेत त्यांनी विविध मुद्यांबाबत भाष्य केलं होते. मशिदीवरील लाऊड स्पीकरच्या मुद्यावरुन राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. त्यानंतर काहीच दिवसात राज्यातील महाविकास आघाडीच सरकार कोसळले आणि राज्यांत नवं सरकार आले होते. या सरकारशी राज ठाकरे यांचे सुत जुळलेले दिसून येत आहे. एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे दिसले होते.





