अर्जुनवाड घाट येथील कृष्णा नदी पुलावर दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दीपक दादासो कांबळे (वय १७, रा.अर्जुनवाड, ता. शिरोळ) ठार तर नायकू अण्णाप्पा कोळी जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात झाली नव्हती.
दीपक सकाळी दुचाकीवरून मिरज हद्दीतील कृष्णाघाट येथील हॉटेलकडे नाष्टा करण्यासाठी जात होता. कोळी मोटारसायकल चालवत होते. तर दीपक मागे बसला होता. कृष्णा नदीच्या पुलावर मिरजेकडून अर्जुनवाडकडे येणाऱ्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. दीपक मिरज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू •असताना त्याचा मृत्यू झाला. कोळी यांच्यावर उपचार सुरू आहेत. धडक दिलेला मोटारसायकलस्वार घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात आले.
दीपकच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. घरी दीपक, त्याचे वडील, भाऊ हे तिघेच राहत होते. मात्र दीपकचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर मुलानेही वडिलांची साथ सोडल्याने गावातून हळहळ व्यक्त होत होती.