राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरनंतर आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
शाळा आणि धार्मिक स्थळांपाठोपाठ आता राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेने संपूर्ण जगाला संकटात टाकले. आपल्या देशातही कोरोनाने कहर केला होता. आता कोरोनाच्या संकटानंतर देश सावरत आहे. कोरोना काळात कडक संचारबंदी, लॉकडाऊन, अंशतः लॉकडाऊनच्या अंमलबजावणीमुळे जगभरात अनेक निर्बंध लागले. त्यात शाळा, मंदिरे, सिनेमागृहे आणि नाट्यगृहे बंद करण्यात आली. आता टप्प्याटप्प्याने सर्व सुरु केले जात आहे.
घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा तर ४ ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय याआधी राज्य सरकारने घेतला आहे.
येत्या ७ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केला.
मुख्यमंत्री म्हणाले, भक्तांची गर्दी रोखण्याची जबाबदारी मंदिर व्यवस्थापनावर राहील. कोरोनाच्या रुग्णसंख्येत उतार असला तरी सावध राहावे लागेल. सर्व प्रार्थनास्थळांवर आरोग्याचे नियम पाळावे लागतील. मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर झालाच पाहिजे.