ताजी बातमी / ऑनलाईन टीमगेल्या आठवडाभरापासून शहरात पाण्याचा यंत्रणेचा बट्ट्याबोळ उडाला असून पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले आहे. त्यामुळे शहरात पाण्यचा ठणठणाट निर्माण झाला असून पिण्याच्या पाण्याबरोबरच नैसर्गिक विधींसाठीही पाण्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे शहरात बोलले जात आहे. त्यामुळे काहीही करा पण तात्काळ पाणी द्या, अशा संतप्त भावना वस्त्रनगरीतून उमटत आहेत.
काल मंगळवारी शहरातील विविध भागात महिलांनी रास्ता रोको करून या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कृष्णा योजना जलवाहिनीला दोन ठिकाणी लागलेल्या गळतीमुळे पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. तर शिरढोण येथे मुख्य जलवाहिनीला क्रॉस पाइपलाईन जोडण्यात येत असल्याने मजरेवाडीतून पाणी उपसा थांबविण्यात आला आहे. परिणामी पंचगंगा योजनेतून होणाऱ्या मर्यादीत पाणी उपसावरच पाणी पुरवठ्याची मदार अवलंबून आहे.