दुष्काळ, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफीसह नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.
माजी खा. राजू शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षे , कापूस , केळी , डाळींब , भाजीपालासह इतर पिकाना फटका बसला आहे. वाढलेली महागाई, बाजारात पडलेले बाजारभाव, वाढलेला उत्पादन खर्च याबरोबरच अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.
राज्यात झालेल्या या नुकसानीमध्ये सर्वाधिक फटका द्राक्ष व केळी उत्पादक शेतक-यांना बसलेला असून या शेतक-यांचे भांडवली नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. द्राक्ष व केळी पिकासाठीचा एकरी उत्पादन खर्च लाखो रूपयापर्यंत गेलेला आहे. हातातोंडाशी आलेले पिक जमिनदोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. याकरिता राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून संबधित शेतक-यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने पाहणी करून राज्य सरकारकडून प्रस्ताव सादर करून केंद्र सरकारने तातडीचे मदत करण्याची मागणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचेकडे केली आहे. भांडवली नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने कर्जाचा बोजा वाढल्याने हतबल झालेल्या शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांना आधार देणे गरजेचे आहे.
अन्यथा शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफीसह नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.