शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवे मारणायाची धमकी मिळालेली असताना आता भाजप आमदाराला सुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकीचे पत्र मिळाले आहे. या प्रकरणी त्या आज दुपारी चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणार आहेत. श्वेता महाले यांना धमकीचे पत्र मिळाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरुन भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याच दिसत आहे.
आमदारांची सुरक्षा कमी केल्यामुळे असे प्रकार वाढू लागलेत का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. श्वेता महाले यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. जिल्हा परिषदेपासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली आहे. आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय आमदार ठरल्या आहेत. स्त्रियांच्या प्रश्नांपासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत त्यांची ठाम मते आहेत. या प्रश्नांवर त्या नेहमीच आवाज उठवत असतात.
कुठून झाली श्वेता महाले यांच्या राजकीय करिअरची सुरुवात?
श्वेता महाले यांनी चिखलीतील जिल्हा परिषदेच्या उंद्री सर्कलचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण सभापती म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी सभापती असताना सर्कलसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणत विभागातील कामे केली होती. या मिनी मंत्रालयाचा अनुभव घेतल्यानंतर त्या थेट विधानसभेसाठी उभ्या राहिल्या आणि पहिल्याच प्रयत्नात विजयी झाल्या.
श्वेता महाले यांनी भाजपचा हा वनवास संपवला
बुलडाण्यातील चिखली मतदारसंघात 15 वर्षापासून कमळ फुलले नव्हते. भाजपचा हा वनवास श्वेता महाले यांनी संपवला. महाले यांना भाजपने 2019मध्ये चिखलीतून उमेदवारी दिली. त्यांच्यासमोर काँग्रेसचे राहुल बोंद्रे उभे होते. बोंद्रे या मतदारसंघातून दोनदा निवडून आले होते. या अत्यंत चुरशीच्या लढतीत महाले या 6 हजार 851 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला. त्यांना 92 हजार 205 मते मिळाली. तर बोंद्रे यांना 85 हजार 433 मते मिळाली. त्यामुळे 2004नंतर भाजपला या मतदारसंघात प्रथमच विजय मिळविता आला.
घरातूनच राजकारणाचं बाळकडू
महाले यांचे पती विद्याधर महाले हे प्रशासकीय खात्यात उच्चपदावर आहेत. त्यांच्या सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी त्यांना राजकीय वारसा लाभला आहे. भाजपचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं. जिल्हा परिषदेत काम केल्यानंतर त्यांनी 2014मध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यावेळी त्यांची संधी हुकली. मात्र, 2019मध्ये संधी मिळताच त्यांनी या संधीचं सोनं केलं.