अत्यंत जुनी व जीर्ण झालेली पंचगंगा पाणी योजनेची जलवाहिनी बदलण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून राज्य नियोजन विभागाकडून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे पंचगंगेतून पुरेसा पाणी उपासा करून पाणीटंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
इचलकरंजी शहराला पंचगंगा नदीतून पिण्यासाठी पाणी उपसा केला जातो. पण पंचगंगा प्रदूषित झाल्याने अन जलवाहिनी अत्यंत जुनी झाल्याने पाणी उपासवर मर्यादा येऊन पाणी पूरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. 1965 साली टाकण्यात आलेली या जलवाहिनीची मूळ हेडर लाईन कट्टीमोळा व जॅकवेलपासून आलेली आहे.
या योजनेची शाहू कॉर्नर तारा हॉटेल ते जनता चौक ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची जलवाहिनी जुनी व जीर्ण झाल्याने याठीकाणी सातत्याने गळतीचा प्रश्न निर्माण होऊन पाणी पुरवठा खंडित होतो. या जलवाहिनी बदलामुळे गळतीचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येऊन पंचगंगेतून अतिरिक्त 20 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरातील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत होऊन सध्या सुरु असलेली वणवण थांबण्यास मदत होणार आहे.
ही जलवाहिनी बदलण्याची व सध्या विस्कळीत झालेला पाणी पुरवठा याची गरज लक्षात घेत आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी ही जुनी जलवाहिनी बदलासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यांच्या प्रयत्नाना यश मिळून राज्य नियोजन विभागाकडून जलवाहिनी बदलण्यासाठी 5 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे सध्याच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे.