सरकारी शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता घसरल्याने विद्यार्थ्यांची संख्याही घटत चालली असताना कोल्हापुरामधून एक सुखद बातमी समोर आली आहे. महानगरपालिकेच्या जरगनगर येथील शाळेत गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुलाचे नाव शाळेत नोंदविण्यासाठी पालकांनी प्रवेशासाठी शनिवारी पहाटे पासूनच गर्दी केली आहे.
इयत्ता पहिलीचे मर्यादित प्रवेश आणि पालकांची मोठी गर्दी यामुळे शाळा व्यवस्थापनसमोर कोणाकोणाला प्रवेश द्यायचा हा मोठा प्रश्न पडला आहे.
जरगनगर येथील महापालिकेची श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाची जरग विद्यामंदिर शाळेची गुणवत्तापूर्ण शाळा ओळख आहे. शैक्षणिक गुणवत्तासह विविध प्रकारच्या परीक्षेतही येथील विद्यार्थ्यांनी सातत्याने यश मिळवले आहे. यामुळेच या शाळेत प्रवेशासाठी गर्दी होत आहे. या शाळेची पटसंख्या २४०० हून अधिक आहे.
महानगरपालिकेसह अन्य सरकारी शाळांबद्दल आजही पालकांच्या मनामध्ये या शाळांमध्ये आपल्या मुलाला प्रवेश घेण्यासाठी नापसंती असते. पण ही शाळा अपवाद आहे. या शाळेने आपली विश्वासर्हता निर्माण केली आहे. त्याचे संपूर्ण श्रेय येथील शिक्षकांचे आहे.
शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेची करून घेण्यात येत असलेल्या तयारीमुळे या परीक्षेत जरगनगर शाळेतील विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत दरवर्षी येत असतात. यामुळे शाळेने एक आदर्श निर्माण केला असल्यामुळे या शाळेकडे पालकांचा ओढा दरवर्षी वाढत आहे. पाडव्याच्या दिवशीच या शाळेतील प्रवेश फुल्ल होत असतो.
गुढी पाडव्याच्या दिवशी पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी शनिवारी पहाटेपासून हजेरी लावली. सायंकाळपर्यंत ही गर्दी वाढत गेली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तर या ठिकाणी शेकडो पालकांनी गर्दी केली. पहिलीसाठी प्रवेश क्षमता ३५० विद्यार्थ्यांची आहे. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांना विनंती केली, की रविवारी सकाळी पहिलीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. तेव्हा सकाळी उपस्थित राहावे, पण पालक जागेवरुन हलले नाहीत.