रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वयाची 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलं-मुली त्यांचं बँक खातं स्वतंत्रपणे चालवू शकतीकल. आरबीआयनं सर्व व्यापारी बँका, खासगी बँका आणि सहकारी बँकांना परिपत्रक पाठवलं आहे.
आरबीआयच्या परिपत्रकानुसार कोणत्याही वयाच्या मुलाचं किंवा मुलीचं खातं त्यांच्या नैसर्गिक आणि कायदेशीर पालकांच्या माध्यमातून उघडता येईल. ते बचत खाते असेल किंवा मुदत ठेव खाते असेल. ते खाते आई ही पालक समजून त्यांच्या माध्यमातून उघडलं जाऊ शकतं.
10 वर्षांच्या वयावरील मुला-मुलींकडून ठराविक रकमेपर्यंत आणि ठराविक जोखीम व्यवस्थापन मर्यादेपर्यंत खाते चालवण्यास परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, या संदर्भातील अटी बँक खातेधारकाला कळवण्यात आल्या पाहिजेत.
अज्ञान खातेधारक जेव्हा कायदेशीरपणे सज्ञान म्हणजे 18 वर्षांचा होईल त्यावेळी बँकांकडून त्याची सही नव्यानं नोंदवून घेऊन ती बँकेच्या दप्तरी नोंद करावी. बँकांनी जेव्हा खातेदार सज्ञान होईल तेव्हा त्यांना या बाबींची पूर्तता करण्यासंदर्भात पत्रव्यवहार किंवा संपर्क करावा.
अज्ञान खातेदाराच्या जोखीम व्यवस्थापन क्षमता धोरणानुसार इंटरनेट बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड आणि चेकबुक द्यावं. बँकेला हे निश्चित करावं लागेल की खातं अज्ञान खातेदार किंवा पालक यांच्याकडून चालवलं जाईल. या खातेदारांची ओळख पटवण्यासाठी केवायसी नियमांचं पालन करावं, असं सांगण्यात आलं आहे.