Friday, June 27, 2025
Homeमहाराष्ट्रही पाच कारणे... ज्यामुळे भारताच्या नादी लागण्यापूर्वी पाकिस्तान दहा वेळा विचार करेल

ही पाच कारणे… ज्यामुळे भारताच्या नादी लागण्यापूर्वी पाकिस्तान दहा वेळा विचार करेल

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी (Pahalgam Terrorist Attack) भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवलं आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. त्यामुळे आधी युद्धाच्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानच्या नेत्यांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना काय करायचं ते सूचत नसल्याचं चित्र आहे. या हल्ल्याचा बदला घेण्याच्या गोष्टी जरी पाकिस्तानचे नेते आणि लष्करी अधिकारी करत असले तरी त्यांना भारताच्या ताकतीचा नेमका अंदाज आहे. त्यातच पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती (Pakistan Economic Crisis) इतकी वाईट झाली आहे की त्यांना युद्ध परवडणार नाही. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारताच्या नावे कितीही खडे फोडले तरी त्यांना गप्प बसण्याशिवाय काहीच मार्ग नाही. पाकिस्तानपुढे महत्त्वाच्या अशा पाच समस्या आहेत ज्यामुळे मनात आले तरी पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देऊ शकणार नाही.

 

Indian Army Vs Pakistan Army : भारतीय सैन्याची ताकद

भारतीय लष्कर हे जगातील एक सर्वात बलाढ्य लष्करापैकी एक आहे. भारताच्या वायूदलाची जगातील सर्वोच्च दलामध्ये गणना होते. तसेच नौदलही अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे. त्यामुळेच पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याआधी दहा वेळा विचार करेल. भारताची लष्करी ताकत लक्षात घेता पाकिस्तान कधीही समोरासमोरील युद्ध खेळणार नाही.

 

स्वीडिश थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अलिकडच्या अहवालात असे दिसून आले आहे की लष्करावर खर्च करण्याच्या बाबतीत भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे.

 

2024 मध्ये, भारताने आपला खर्च 1.6 टक्क्यांनी वाढवला आणि संरक्षण क्षेत्रात एकूण 86 अब्ज डॉलर्स (सुमारे 7,32,453 कोटी रुपये) खर्च केले. तर त्या तुलनेत, पाकिस्तानचा त्यांच्या सैन्यावरील खर्च फक्त 10.2 अब्ज डॉलर्स (सुमारे 2,85,397 कोटी पाकिस्तानी रुपये) आहे.

 

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानची ढासळणारी अर्थव्यवस्था

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण आज त्यांच्या आर्थिक परिस्थितीत खूप फरक आहे. गरिबीतून जात असलेल्या पाकिस्तानचा जीडीपी गेल्या वर्षी 374 अब्ज डॉलर्स होता. त्याच वेळी, भारताचा जीडीपी 4.3 ट्रिलियन डॉलर्स असण्याचा अंदाज आहे.

 

आयएमएफच्या नवीन आकडेवारीनुसार, भारत 2025 पर्यंत जपानसारख्या देशाला मागे टाकून चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपानसारखे देश भारताच्या पुढे आहेत. अशा परिस्थितीत, आर्थिक आघाडीवरही भारत पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे हे स्पष्ट आहे.

 

IMF Fund To Pakistan : अडचणीत मदत मिळत नाही

भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून आर्थिक मदत मागितली आहे, परंतु 9 मे रोजी यावर निर्णय होणार आहे. या दरम्यान, क्लायमेट रेझिलियन्स लोन प्रोग्राम अंतर्गत पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या 1.3 अब्ज डॉलर्स (सुमारे 11,000 कोटी रुपये) बद्दल आढावा बैठक होणार आहे. याशिवाय, बेलआउट पॅकेज अंतर्गत पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या 7 अब्ज डॉलर्स (59,000 कोटी रुपये) च्या दुसऱ्या हप्त्याचाही आढावा घेतला जाणार आहे.

 

पाकिस्तान चीनकडे मदतीची याचना करत आहे. पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी स्वतः अलिकडेच एका मुलाखतीत म्हटले होते की, स्वॅप कराराद्वारे पाकिस्तानने चीनकडून 10 अब्ज युआन (सुमारे 1.4 अब्ज डॉलर्स) आर्थिक मदत मागितली आहे.

 

Pakistan Share Market Crisis : पाकिस्तानी शेअर बाजार कोसळला

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजाराची स्थिती खूपच वाईट आहे. भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. हल्ल्याच्या दिवशी, बुधवारी ट्रेडिंग सत्रात बेंचमार्क केएसई-100 निर्देशांक काही तासांतच तो 3559 अंकांनी घसरला. यासह, केएसई निर्देशांक 1,07,007 च्या पातळीवर पोहोचला. त्याच वेळी, या सर्वांचा भारतीय शेअर बाजारावर कोणताही परिणाम होत नाही. बुधवारी सेन्सेक्स 80,000 अंकांच्या वर उघडला आणि निफ्टीही 24,300 च्या पातळीच्या जवळ राहिला.

 

आयएमएफकडून मदत थांबण्याची भीती

पहलगाम हल्ल्यानंतर, इतर देश पाकिस्तानला कर्ज देण्याचे टाळत आहेत. जर पाकिस्तानवर काही कारवाई झाली तर तो देश कर्ज फेडू शकणार नाही अशी त्या देशांना भीती आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला आयएमएफकडून मदतीची आशा आहे.

 

सुमारे सात अब्ज डॉलर्सच्या एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (EFF) कार्यक्रमाद्वारे पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या कर्जाचा आढावा घेण्यासाठी IMF कार्यकारी मंडळ 9 मे रोजी पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी भेटणार आहे. पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचा पहिला हप्ता मिळाला आहे. उर्वरित 6 अब्ज डॉलर्स पुढील 37 महिन्यांत दिले जातील.

 

पाकिस्तानला आयएमएफकडून 1.3 अब्ज डॉलर्सची मदतही मिळणार आहे. परंतु जर पहलगाम हल्ल्यामुळे पाकिस्तान हा फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या रडारवर आला तर आयएमएफकडून मिळणारी मदत थांबू शकते. अशा परिस्थितीत, कर्जबाजारी पाकिस्तान भविष्यात कसे टिकेल याची चिंता करत आहे.

 

या पाच कारणांचा विचार करता पाकिस्तानला सध्याच्या स्थितीत युद्ध करणे, भारतावर हल्ला करणे परवडणारं नाही. त्याचमुळे पाकिस्तान दहशतवादाला पोसून भारताविरोधात त्याच्या कारवाया चालू ठेऊ शकतो. पण भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या धडाक्यानंतर हा दहशतवाद किती काळ पोसायचा यावरदेखील पाकिस्तानला विचार करावा लागणार हे नक्की.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -