हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथील तलावात जाखले येथील शेतकरी सुरज पाटील यांच्या बैलगाडी तलावात शिरली. यामध्ये एका बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दुसऱ्या बैलाला वाचवण्यात यश आले आहे.
हि घटना मंगळवारी (दि.१०) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
मंगळवारी सकाळी जाखले (ता. पन्हाळा) येथील शेतकरी सुरज पाटील हे मनपाडळे गावच्या पश्चिमेस असणाऱ्या शेतात खरीप पूर्व मशागतीस गेले होते. सकाळी मशागत झाल्यानंतर अकराचं सुमारास शेजारी असणाऱ्या गाव तलावात बैलांना पाणी पाजून धुण्यासाठी बैल जोडी पाण्याकडे नेली असता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बैलजोडी गाडीसह पाण्यात गेली.
बैलांना बुडताना पाहून शेतकरी सुरज त्यांचे वडील पंडित व सोबत सचिन गोसावी या तिघांनीही त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला. बैल खोल पाण्यात बुडत असताना स्थानिक शेतकरी जमा झाले. त्यांनी बैल बाहेर काढले यामध्ये एक बैलाच्या गळ्याभोवती असणाऱ्या चामडी चापती आवळल्याने त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या बैलाला वाचवण्यात यश आले.
ही घटना समजतात मनपाडळे तलाठी सतिश नेवरेकर, पशुवैद्यकीय अधिकारी आरती दांडगे पोलीस पाटील माणीक पाटील यांनी पंचनामा केला. यामध्ये एक लाख तीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले.
खरीप हंगामासाठी एक दिवसापूर्वीच केली होती बैलजोडीची खरेदी
खरीप हंगाम तोंडावर आल्याने सुरज पाटील या शेतकऱ्याने नुकतेच सोमवारी (दि.९) कोलोली येथून तीन लाखाला बैलजोडी खरेदी केली होती. आणि मंगळवारी (दि.१०) त्यांच्यावर हा प्रसंग आल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.