देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असून स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक घोषणाही केल्या आहेत. जीएसटीच्या आढाव्यासोबतच पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना सुरू केली आहे.याच योजनेअंतर्गत, तरुणांना पहिली नोकरी मिळाल्यावर 15, 000 रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल.
प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजनेची घोषणा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील तरुणांसाठी ही एक मोठी बातमी आहे. आज, 15 ऑगस्ट रोजी, आपण माझ्या देशातील तरुणांसाठी 1लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत आहोत.
ते म्हणाले की, प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना आजपासून लागू करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या मुला-मुलींना सरकारकडून 15 हजार रुपये दिले जातील. या योजनेअंतर्गत पुढील 2 वर्षात 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या अटींवरच मिळेल रक्कम
सरकारने सुरू केलेली ही नवीन योजना विशेषतः उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार आहे. हेच लक्षात घेऊन ही योजना बनवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, तरुणांनी पहिल्यांदाच कंपनीत काम करताच किंवा पहिली नोकरी मिळताच त्यांना ही रक्कम दिली जाईल. मात्र, यामध्ये अनेक अटी देखील घालण्यात आल्या आहेत. याअंतर्गत, नोकरी मिळवणाऱ्या तरुणाला त्या कंपनीत किमान 6 महिने काम करावे लागेल. यासोबतच, ती कंपनी EPFO मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. जर या सर्व अटी पूर्ण झाल्या तर तरुणांना प्रोत्साहन राशी दिली जाईल.
योजनेसाठी कसा कराल अर्ज ?
पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्याची गरज नाही. तुम्हाला एखाद्या कंपनीत नोकरी मिळताच किंवा तुमचे पीएफ खाते उघडताच तुम्ही या योजनेसाठी पात्र व्हाल. या योजनेचा पहिला हप्ता किंवा रक्कम तुम्हाला नोकरी मिळाल्यानंतर 6 महिन्यांनी दिली जाईल. जी थेट तुमच्या खात्यात जमा होईल.