लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहे. यातून अपात्र महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
आता पात्र महिलांचेदेखील अर्ज तपासले जाणार का त्यांचेही अर्ज बाद केले जाणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे. दरम्यान, कोणत्याही पात्र लाडक्या बहिणींवर कोणताही अन्याय होणार नाही, असं आदिती तटकरेंनी सांगितलेलं आहे.
आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या? (Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana)
राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यावर त्या बोलत होत्या. सध्या मिळालेला डेटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे. अनेक लाभार्थींना अन्य योजनांचा लाभ मिळत असेल. यातील काही लाभार्थी पात्र ठरू शकतात. काही पहिल्याच पडताळणीत बाद ठरल्या असतील. आलेल्या सर्व माहितीची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार (Ladki Bahin Yojana Reverification Process)
लाडकी बहीण योजनेत अडीच कोटी लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. त्यातील २६ लाख महिला अपात्र असल्याचे समोर आले आहे. आता या सर्व महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहे.अंगणवाडी सेविका महिलाना प्रश्न विचारणार आहेत. त्यातून जर एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जातील.