दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या उत्सवावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. मुंबई पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी खास तयारी केली आहे. तसेच सर्वाधिक गर्दी असलेल्या लालबागच्या राजाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस तैणात करण्यात येणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
15 हजार पोलिस तैणात
मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल 15 हजार पोलिस तैणात करण्यात आले आहे. तसेच श्वानपथक, बीडीडीएस, 12 एसआरपी कंपनी, क्यूआरटी, 11 हजार सीसीटिव्ही कॅमेऱ्यांद्वारे मुंबईवर करडी नजर ठेवली जाणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही लक्ष ठेवले जाणार आहे. लालबागच्या राजासाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्त असणार आहे. 500 पेक्षा या ठिकाणी तैणात असणार आहेत अशी माहिती सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे.
450 मोबाइल व्हॅन, 350 बीट मार्शल याचा फिरता पहारा
गणेशोत्सवात चोपाटीवरही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. चौपाटीवरही स्वतंत्र सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तसेच यासह 450 मोबाइल व्हॅन, 350 बीट मार्शल याचा फिरता पहारा असणार आहे. तसेच गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत 7 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 36 पोलिस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलिस आयुक्त, 2600 पोलिस अधिकारी आणि 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना
मुंबईसह कोकणातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यात पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने मुंबईतील गणेशभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विशेष ‘नमो एक्सप्रेस’ रवाना करण्यात आली. कॅबिनेट मंत्री लोढा यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या मलबार हिल मतदारसंघातील नागरिकांसाठी ही सुविधा देण्यात येते. त्यासाठी महिनाभरापासून विभागातील सर्व कार्यकर्ते कार्यरत असतात. विशेष म्हणजे या प्रवासासाठी केवळ भाजपा कार्यकर्तेच नाही तर इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनाही अतिशय अल्प दरात प्रवासाची संधी दिली जाते. कोकणात जाणाऱ्या सुमारे 2 हजार गणेशभक्तांसाठी मोफत नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था यावेळी करण्यात आली होती.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी गणेशभक्तांमध्ये अधिक उत्साह दिसून येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रवासासाठी गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी अतिशय सुलभ प्रक्रियेने ही ‘नमो एक्सप्रेस’ कोकणात रवाना करण्यात येत आहे.’