राज्यभरात पावसाने धुमाकूळ (Heavy Rain) घातला आहे, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं (Heavy Rain) शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे, अनेक पिके जमीनदोस्त झाली आहेत, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCPSP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत आढावा घेतला, याबाबत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, जिथं पाऊस पाण्याची कमतरता असते, तिकडे अतिवृष्टी झाली. त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्याच्या संसारावर झाला आहे. आपण बघितलं, या महिन्यात सोयाबीनंचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, काही भागात कापूस घेतला जातो, अन्य पीकं घेतली जातात. सोयाबीनचे पीके हे भरवश्याचं पीक असते. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि बाकीच्या पिकांची वाढ झाली, पण पाच दिवस वाफ्यात पाणी राहिलं आणि त्यामुळे सोयाबीनसह इतर पीकं कुजून केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्याच्यापासून उत्पादन होतं, ते हातात पडलेले नाही. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आपण दुष्काळ पाहिला पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नाही. ही अतिवृष्टी ज्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस असतो, तिकडे झाली आहे.
नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला साहाय्य करण्याची योजना
सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, परभणी, दक्षिण नगर हे भाग आहेत, या सगळ्याठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला साहाय्य करण्याची योजना आहे. राज्यामार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. दरवर्षी केंद्र सरकारकडून अशा परिस्थितीत मदत करायला जी योजना आहे, त्याचा लाभ घेऊन राज्य सरकारने वेगाने पंचनामे करुन घेणे आणि तातडीने त्यांना नुकसान भरपाई देणे, या दोन गोष्टी करण्याची गरज आहे असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
Sharad Pawar: आम्ही अपेक्षा करतो, राज्य सरकार अत्यंत याचा गांभीर्याने विचार करेल
पुढे शरद पवार म्हणाले, ही नुकसान भरपाई कशाची असते, एक पीक, दोन गुरेढोरं आणि तिसरं जमीन वाहून गेली. पीक वाया गेलं तर फक्त त्यावर्षी नुकसान होते. पण जमिनीवरची माती वाहून गेली तर त्यामधून उत्पादन येण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे यावेळची मदत फक्त पंचनामे करुन, पीक गेलं म्हणून चालणार नाही. पिकासाठी मदत द्यावीच लागेल. पण जमिनीसाठीही मदत करावी लागेल. त्यासोबत पाणंद रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, त्यासाठीही मदत करावी लागेल. अनेक ठिकाणी तक्रारी आहेत, गुरं वाहून गेली. या सगळ्या गोष्टीकडे राज्य सरकारने बघितले पाहिजे, हे काम सरकारने गतीने केले पाहिजे. पहिल्यांदा पंचनामे, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे, पिकांची पाहणी करणे आणि वास्तव पंचनामे करणे, गरजेचे आहे. यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरुपाची मदत ही अभूतपूर्व परिस्थितीत शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. आम्ही अपेक्षा करतो, राज्य सरकार अत्यंत याचा गांभीर्याने विचार करेल.




