अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना मनरेगामधून साडेतीन लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यापैकी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख रुपये जमा करावेत’, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर करण्यात आलेले मदतीचे पॅकेज फसवे आहे, असा आरोपही त्यांनी केला. हे आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठे पॅकेज नाही तर आत्तापर्यंतच्या इतिहासातील सरकारने मारलेली ही सर्वांत मोठी थाप आहे, असे ते म्हणाले.
या वेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, ओमराजे निंबाळकर, अरविंद सावंत, आमदार अनिल परब, मिलिंद नार्वेकर, कैलास पाटील, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे , माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी नेते यावेळी उपस्थित होते.
दुपारी क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेले शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे हेही स्वत: पूर्ण मोर्चाभर यात सहभागी झाले होते. हा मोर्चा गुलमंडीवर पोहोचल्यावर त्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी या सभेला संबोधित केले.
ते म्हणाले, ‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रतिहेक्टर मदत मिळावी , शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत ही इतिहासातील सर्वांत मोठी मदत आहे, असे सरकार सांगत आहे, परंतु ही सर्वात मोठी मदत नसून सर्वांत मोठी मारलेली थाप आहे.’ ‘ज्यांनी पन्नास खोके घेतले त्यांच्याकडे आपण हेक्टरी पन्नास हजारांची मदत मागत आहोत, ही मदत सरकार सहजासहजी देणार नाही त्यासाठी हातात आसूड घ्यावा लागेल,’ असा इशारा त्यांनी दिला. ‘अतिवृष्टीमुळे ज्या-ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. त्या त्या शेतकऱ्यांना मनरेगाच्या माध्यमातून साडेतीन लाखांची मदत देण्याचा उल्लेख पॅकेजमध्ये करण्यात आला आहे, त्यापैकी एक लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने जमा करावेत.’ उद्धव यांच्यासह अन्य नेत्यांचीही यावेळी भाषणे झाली.
पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरही उद्धव यांनी भाष्य केले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस महाराष्ट्रात होते. मात्र त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली नाही. दुसरीकडे, बिहारमध्ये निवडणूका असल्यामुळे तिकडे मदत केली जात आहे. बिहारमधील महिलांना दहा हजार रुपयांची मदत दिली जात आहे. बिहारमधील महिलांना तुम्ही मदत करीत असाल तर देशातील सर्व महिलांना अशा प्रकारची मदत करा’, असे ते पंतप्रधानांना उद्देशून म्हणाले.
उपमुख्यमंत्रीपद काढून घ्या
राज्य सरकारने अद्याप विधानसभेतील विरोधी पक्षनेता नेमलेला नाही. विरोधी पक्षनेता न नेमण्यामागे राज्यघटनेतील नियमांवर बोट ठेवले जाते. नियमानुसार विरोध पक्षनेता नेमता येत नसेल तर दोन-दोन उपमुख्यमंत्री कसे नेमले’, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. उपमुख्यमंत्रिपद घटनेस धरून नाही. त्यामुळे त्या दोघांचे उपमुख्यमंत्रिपद काढून घ्या, त्यांना साधे मंत्री म्हणून काम करू द्या’, असे ते म्हणाले