राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. राज्यातील पारा घसरला असून थंडीची लाट पसरली आहे. बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमान 9 ते 10 अंशांपर्यंत खाली आले आहे. पुढील 48 तासांत धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे हुडहुडी भरविणारी कडाक्याच्या थंडीची लाट सर्वत्र पसरली आहे. हवामानातील बदलामुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील किमान तापमानात बहुतांश जिल्ह्यात किमान तापमान 9 अंशांपर्यंतखाली गेले. 15 ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत गेलेले किमान तापमान आज 9 अंशापर्यंत खाली आले आहे.
चक्रीवादळानंतर संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका
गोंदिया जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीचा जोर चांगलाच वाढलेला आहे. तापमानात अचानक घट झाल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सकाळच्या सुमारास दाट धुक्याने अक्षरशः चादर पांघरली. रस्त्यावर काही मीटर अंतरावरही पुढील व्यक्ती किंवा वाहन स्पष्ट दिसत नाहीये.
डिसेंबरमध्ये राहणार राज्यभर थंडीची लाट
काही दिवसांपूर्वी राज्यातील थंडी गायब झाली होती. नोव्हेंबरच्या सुरूवातीच्या आठवड्यात राज्यात पाऊस होता. त्यानंतर गारठा वाढला. मात्र, दोन ते तीन दिवसांपासून थंडी चक्रीवादळामुळे कमी झाली होती आणि अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला होता. आता पुन्हा राज्यात गारठा वाढला आहे. हेच नाही तर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांमध्ये गारठा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाचा मोठा अंदाज
विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे. संपूर्ण डिसेंबर महिनाभर थंडी कायमच राहिल.मागील काही दिवसांमध्ये गारठा वाढल्याने राज्यातील काही भागातील पारा 6 अंशांपर्यंत गेला होता. हिटवाह चक्रीवादळामुळे राज्यातील तापमान कमी अधिक होताना दिसत आहे. राज्यात आता सर्वत्र गुलाबी थंडीचा अनुभव घेता येईल.



