नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूरमध्ये भीषण वाहन अपघात घडला. तावडे हॉटेलजवळ, समोरून आलेल्या वाहनाच्या प्रखर प्रकाश झोतामुळे कारचालकाने ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबल्याने, कार भरधाव वेगाने रस्त्याकडील शेकोटीजवळ थांबलेल्या चौघांना धडकली.
अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.
या अपघातात दिलीप आण्णाप्पा पवार (६५, रा. वळीवडे रोड, गांधीनगर, कोल्हापूर)
सुधीर कमलाकर कांबळे (४१, रा. घरनिकी, आटपाडी, सांगली)
विनयसिंह गौंड (२७, रा. मौरदहा, मध्यप्रदेश)
यांचा मृत्यू झाला असून नवला नारायण शेळके जखमी झाले आहेत. शेळके यांच्यावर सध्या सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक मुकेश अरुण अहिरे (२९, मूळ रा. मुंबई, सध्या रा. कारंडे मळा, कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अहिरे एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसाठी काम करत असून, कराड येथील हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे, समोरून आलेल्या वाहनाची लाइट चकाकी करून चाललेल्या कारचालकाचे नियंत्रण सुटले. घाईत ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबल्याने कार रस्त्याकडील शेकोटीजवळ थांबलेल्या लोकांना धडकली. रिक्षाचालकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवून पोलिसांना अपघाताची माहिती दिली. उपनिरीक्षक अंकुश कारंडे यांच्या पथकाने तातडीने अपघातस्थळी पोहोचून मृतांचे सीपीआरमध्ये परीक्षण केले आणि कारचालकाला अटक केली.पोलिसांनी कारचालकावर अपघातासंबंधी गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.






