दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीकाठावरील तांबोळी मळी परिसरात मोठी मगर गवताच्या कुरणात पहुडलेली पाहावयास मिळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात शेतकरी, शेतमजूर व मेढपाळांची नियमित वर्दळ असते.
त्यामुळे वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
वारणा नदीच्या काठालगत असलेल्या गवताळ भागात ही मगर दिवसाढवळ्या राजरोसपणे उन्हात पडून राहते. नदीकिनारी असलेल्या शेतांमध्ये गवत कापण्यासाठी, जनावरांना चारा गोळा करण्यासाठी शेतकर्यांना जावे लागते. अशा ठिकाणी मगर वारंवार दिसू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गतवर्षी एक मेंढी व एका शेळीचा मगरीने फडशा पाडला होता, तर नुकताच संस्कार गावडे या मेंढपाळाच्या पाळीव कुत्र्याला मगरीने ठार केले होते. या मगरीचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.






