केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलाला देशभरातून तीव्र विरोध केला जात आहे. या कामगार कायद्यांविरोधात देशभरातील दहा कामगार संघटनांनी उद्या गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनीही या भारत बंदला पाठिंबा दिला असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनेही उद्याच्या भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे.
भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा
केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांमुळे कामगारांच्या समोर विविध प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांच्या हिताला बाधा पोहचलेली आहे, या नव्या बदलामुळे कामगारांच्या हाताला कमी संधी मिळणार आहे. केंद्रातील भाजपा सरकारचे धोरण हे शेतकरी व कामगार विरोधी असल्याने या बंदमध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, अशा सुचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील यांनी दिली आहे.
भारत बंदमध्ये या 10 संघटनांचा सहभाग
भारत बंदमध्ये 10 केंद्रीय कामगार संघटना सहभागी होणार आहेत. यामध्ये INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC यांचा समावेश आहे. चार नवीन कामगार कायद्यांमुळे कर्मचारी, कामगारांचे अधिकार हिरावल्या जात असल्याचा आरोप करत या संघटनांनी बंद पुकारला आहे. आता याला काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे, त्यामुळे हा बंद आणखी परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे.
काय काय बंद असेल, काय असेल सुरू?
उद्याच्या भारत बंदमध्ये देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याची अधिकृत आदेश नाहीत. केरळ, कर्नाटक आणि ओडिसा राज्यात या बंदचा प्रभावी परिणाम दिसू शकतो. इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही शाळा, महाविद्यालये बंद असू शकतात. 12 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज प्रभावित होईल. बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. अर्थात बँकांनी अथवा रिझर्व्ह बँकेने या दिवशी सुट्टीची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण काही बँकांतील कामकाजावर त्याचा थेट परिणाम दिसून येईल.




