नेते अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्यातील अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे. अजितदादा राज्याचे अर्थमंत्री होते. याआधीचा अर्थसंकल्प अजितदादांनीच सभागृहात मांडला होता. परंतु अजितदादा अनंताच्या प्रवासाला निघून गेल्याने यावेळचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सादर करणार आहेत. अजितदादांच्या पश्चात उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांचे यावेळचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. याच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार आपले पती आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्याविषयी बोलल्या आहेत. त्यांनी नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं, असं म्हणत अजितदादांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केलं.
अजितदादांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर
यावेळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार बोलत होत्या. यावेळी बोलताना, जनतेने पुन्हा एकदा महायुतीला सत्ता दिली. अजितदादांनी एकूण 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आदरणीय दादा यांनी पहिला अर्थसंकल्प 2011 साली सादर केला होता. त्यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता तो एक लाख 44 हजार 783 कोटी रुपयांचा होता. तर मागच्या वर्षी म्हणजेच 2025 साली अजिदादांच्या कारकिर्दीतील अर्थसंकल्प होता. हा अर्थसंकल्प 7 लाख 20 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. ही फक्त आकड्यांची वाढ नाही तर महाराष्ट्राला सर्वांगीन विकासाकडे नेण्याचा प्रयत्न आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच..
तसेच, विकासाच्या यात्रेत अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीशी आणि पारदर्शकतेशी कधीही तडजोड केली नाही. विकास आणि शिस्त राखत महाराष्ट्राला सक्षम करण्याचं काम अजितदादांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने अजिदादांनी यावेळच्या अर्थसंकल्पाला जोरदार सुरुवात केली होती. मात्र यंदाचा अर्थसंकल्प अजितदादांच्या कारकिर्दीतील 12 वा अर्थसंकल्प ठरला असता. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अजितदादा अचानक आपल्याला सोडून गेले, असं दु:ख त्यांनी व्यक्त केलं.
अर्थव्यवस्था वाढवणे हा अजितदादांचा ध्यास
अजितदादांचे निधन होण्यापूर्वीच त्यांनी तसेच त्यांच्या टीमने अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यापर्यंत नेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत साध्य करण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढवणे हा अजितदादांचा ध्यास होता. त्यासाठी अजितदादा सातत्याने प्रयत्नशील होते. आर्थिक शिस्त आणि विकासाचा समतोल हेच त्यांच्या कामाचे सूत्र होते, असेह सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
महायुती सरकार सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी टीका करण्यात आली. परंतु अजितदादांनी योग्य आर्थिक नियोजन करून या योजनेसाठी निधीची कमतरता कधीच भासू दिली नाही. ही योजने त्यांनी यशस्वीपणे सुरू ठेवली. माझे हे पहिलेच अधिवेशन आहे. हे अधिवेशन चांगल्या प्रकारे, नियोजनबद्ध चालेल अशी मला खात्री आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.






