राज्य सरकारने महाराष्ट्राची प्रशासकीय रचना अधिक मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने २०२५ मधील आयएएस (IAS) बॅचमधील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०२५ बॅचमधील ८ जणांची महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात नियुक्ती केली आहे.
हे अधिकारी, मुसोरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये (एलबीएसएनएए) त्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्त केले जात आहेत. यावेळी त्यांना तळागाळातील प्रशासनाचे बारकावे शिकवण दिली जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असून या कालावधीत, ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. तसेच महसूल, आपत्ती व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये त्यांना अनुभव मिळणार आहे.
‘या’ अधिकाऱ्यांची नियुक्ती
अजय काशीराम डोके यांची गडचिरोली आणि अमल पी. व्ही. यांची पालघर जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे. अप्सरा एन. यांची पुण्यात, दिव्यांक गुप्ता यांची बीडमध्ये आणि जयकुमार शंकर यांची नाशिक जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पंकज मनोहर पाटले नंदुरबारमध्ये तर आर. रंगरामन जालना येथे आणि शोभिता पाठक वर्धा जिल्ह्यात कार्यरत असतील.
भावी नेतृत्वाला घडवणे हा या नियुक्त्यांचा उद्देश आहे. या नियुक्त्यांमुळे गडचिरोली आणि नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल आणि आव्हानात्मक भागांमध्ये नक्षलवाद, पायाभूत सुविधांचा विकास आणि आरोग्यसेवा अशा समस्या समजून घेण्याची संधी अधिकाऱ्यांना मिळेल. तर पुणे आणि नाशिकसारख्या वेगाने शहरीकरण होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना औद्योगिक विकास, स्थलांतर आणि पर्यावरणाचा समतोल राखणे यांसारख्या आधुनिक प्रशासकीय आव्हानांना सामोरे जावे लागेल.

