महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल शनिवारी अधिकृत जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या निकालात मुलींनीच वर्चस्व गाजवले आहे.
राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भंडाऱ्यातील एका तरूणाने आयुष्याचा दोर कापलाय. नापास झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या १८ वर्षाच्या तरूणाने आत्महत्या केली. लेकाने आत्महत्या केल्याने आई-वडिलांना जबर धक्का बसला. गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नेहमीप्रमाणे परीक्षेचा निकाल हा आनंदाचा क्षण असतो, मात्र याच निकालाने एका उमद्या तरुणाचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील रोंघा येथे घडली आहे. बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याच्या धक्क्यातून १८ वर्षीय नावेद होलाराम खंडाते या तरुणाने शेतात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. रोंघा येथील रहिवासी असलेला नावेद खंडाते याने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर आपण अनुत्तीर्ण झाल्याचे समजताच तो मानसिक तणावात होता. याच नैराश्यातून शनिवारी दुपारी त्याने गावाजवळील शेत गाठले आणि तिथे गळफास लावून आत्महत्या केली.
मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. भंडारा जिल्ह्याने ८४.१२ टक्के निकालासह नागपूर विभागात पाचवे स्थान पटकावले. यंदाही नूतन कन्या ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आपली गौरवशाली परंपरा कायम ठेवत उल्लेखनीय यश संपादन केले. नूतन कन्या कॉमर्स ज्युनिअर कॉलेजची गीतिका श्याम धूत हिने सर्व संकायांमधून १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. कॉमर्सच्याच पल्लवी सतीश बाभरे हिने ९८.५० टक्के गुणांसह जिल्ह्यात द्वितीय, तर अपूर्वा गिरधारी भेलावे हिने ९७.६७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला
महत्त्वाची नोट –
आत्महत्या हा कोणत्याही संकटावरचा पर्याय किंवा उत्तर असू शकत नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची आवश्यकता असते. शिक्षण हा यशाचा केवळ एक मार्ग आहे, म्हणजेच संपूर्ण आयुष्य नव्हे. त्यामुळे परीक्षेत अपयश आल्यास खचून जाऊन टोकाचे पाऊल उचलू नका; पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करा. अपयशावर मात करून यशस्वी व्यावसायिक किंवा मोठ्या हुद्द्यावर पोहोचलेली अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. लक्षात ठेवा, ‘हार मानणे’ हा पर्याय नाही, तर ‘पुन्हा लढणे’ हीच यशाची गुरुकिल्ली आहे.



