उकाड्याने हैराण झालेल्या तसेच गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने रविवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने जनजीवन काहीकाळ विस्कळीत झाले होते. पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या जोरदार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण
झाला होता. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात होते. गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढत चालला होता. वाढता
उष्मा पहाता पावसाची प्रतिक्षा केली जात होती. मात्र पाऊस सतत हुलकावणी देत होता. शुक्रवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ हजेरी लावली. मात्र पुन्हा हवेत कमालीचा उकाडा वाढला होता. त्यामुळे पुन्हा पावसाची प्रतिक्षा केली जात होती. त्यानुसार रविवारी सायंकाळी शहर व परिसरात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक सखल भागात पाणी साचले होते. तर गटारी तुडूंब भरून वाहत होत्या. कचऱ्यामुळे अनेक भागातील गटारी तुंबून पाणी रस्त्यावर साचल्याचे दिसून आले.
महापालिकेने अनेक भागात विविध कारणास्तव रस्ते खोदले आहेत. खोदाईचे काम झाल्यानंतर तेथे कोणतीच डागडूजी केली गेली नाही. तथापि तेथील भर अन्यत्र उचलून नेल्याने पुन्हा तेथे पावसाचे पाणी मुरल्याने तसेच लहान मोठी वाहने गेल्याने या चरी पुन्हा दिसत आहेत. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
रविवार असल्याने अनेक नागरिक संध्याकाळच्या सुमारास खरेदीच्या निमित्ताने बाहेर पडले होते. मात्र पावसामुळे त्यांची चांगलीच ताराबंळ उडाली. अनेक दुकानदारांना देखील आपले साहित्य झाकून ठेवण्यासाठी कसरत करावी लागली. सुमारे अर्धापाऊण तास झालेल्या जोरदार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता.






