सध्यातरी आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. काल गुरुवारी जिल्ह्यात दिवसभर सूर्यराजाचे दर्शन झाले. परिणामी, पंचगंगेच्या पुराला ओहोटी लागली आणि तासागणीक वाढणाऱ्या पाणी पातळीत घट सुरू झाली. दिवसभरात पंचगंगा पातळीत ९ इंचांची घट होऊन पातळी रात्री १२ वाजता ३६ फूट ४ इंचांवर होती.
दिवसभरात १५ बंधारे खुले झाले असून अद्याप ४२ बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये राधानगरीसह १० धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली, तर जिल्ह्यात सरासरी २२ मि.मी. पाऊस झाला.
धरणांत ४७.४३ टीएमसी साठा; राधानगरी ५९, वारणा ५८, दूधगंगा २९ टक्के भरले
प्रमुख १७ धरणांत गुरुवारी (दि. ९) दुपारी चार वाजेपर्यंत ४७.४३ टीएमसी पाणीसाठा झाला. जिल्ह्यातील धरणांत एकूण ९६.०७ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे, त्या तुलनेत ४९.३७ टक्के पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने वाढत गेली. परिणामी सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. दरम्यान घटप्रभा, त्यापाठोपाठ कोदे आणि जांबरे ही तीन लहान धरणे पूर्णपणे भरली आहेत. राधानगरी धरण गुरुवारी ५९.४० टक्के इतके भरले. दूधगंगा धरण २८.८३ टक्के भरले आहे. वारणा ५७.७५ टक्के तर तुळशी धरण ५५.२४ टक्के भरले आहे. जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाले. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत केवळ कासारी (२५ मि.मी.) व घटप्रभा (११ मि.मी.) वगळता अन्य सर्व धरण क्षेत्रात तुरळक पाऊस झाला. पावसाचा जोर कमीच राहिला तर धरणातील साठ्यात यापुढे संथ वाढ होईल, अशी शक्यता आहे.

