Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरमोठी बातमी: राज्यातील साखर कारखान्यांसाठी धोक्याची घंटा

मोठी बातमी: राज्यातील साखर कारखान्यांसाठी धोक्याची घंटा

राज्यात पावसाने ओढ दिल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे गाळप कमी होऊन साखरेचे (suger) उत्पादन सुमारे बारा लाख टनांनी घटण्याचा प्राथमिक अंदाज साखर आयुक्तालयाकडून व्यक्त केला जात आहे. हा अंदाज खरा ठरल्यास मागील काही वर्षांत गाळप क्षमता वाढविलेल्या साखर कारखान्यांच्या ‘बॅलन्स शीट’वर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.राज्याची प्रतिदिन गाळप क्षमता आठ लाख ८२ हजार ५५० टन एवढी आहे. त्यानुसार, गेल्या हंगामात राज्यातील बावीस जिल्ह्यांतील कारखान्यांकडून १०५२ लाख टन उसाचे गाळप झाले होते.

यंदा १४ लाख ३७ हजार हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. ऊस उत्पादनात आघाडीवर असलेल्या कोल्हापूर, सांगलीसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. परिणामी यंदा प्रत्यक्षात ९७० लाख टनांइतके ऊस गाळप होण्याचा अंदाज असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ८३ लाख ९१ हजार टनांनी गाळप कमी होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यातून इथेनॉल निर्मितीकडे १५ लाख टन साखर वळवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे ९४ लाख टन साखरेचे उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १०५ लाख ३१ हजार टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्या तुलनेत यंदा सुमारे बारा लाख टनांनी साखरेचे उत्पादन कमी होईल, अशी माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली.

राज्यात प्राथमिक अंदाजानुसार…

ऊस लागवड केलेले क्षेत्र : १४ लाख ३७ हजार हेक्टर

अंदाजे उपलब्ध होणारा ऊस : १ हजार ७८ लाख टन

ऊस गाळप होण्याचा अंदाज : ९७० लाख टन

साखर (suger) उत्पादनाचा अंदाज : १०९ लाख टन

इथेनॉल निर्मितीकडे जाणारी साखर : १५ लाख टन

प्रत्यक्षात साखरेच्या उत्पादनाचा अंदाज : ९४ लाख टन

साखर कारखान्यांना फटका बसणार?

राज्यात गेल्या काही वर्षांत अनेक मोठ्या साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. मात्र, ऊसतोडणी लवकर होत नसल्याने गाळपासाठी पुरेशा प्रमाणात ऊसाची उपलब्धता होत नाही. गेल्या वर्षी हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात अनेक कारखान्यांना ही समस्या भेडसावली. यंदा पुरेसा पाऊस नसल्याने उसाचे उत्पादन घटणार असून, परिणामी कारखाने तीन ते सव्वातीन महिने चालतील, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती आहे.

यंदा राज्यात पावसाने ओढ दिली आहे. त्याचा उसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन ऊसाच्या पीक परिस्थितीचा अंतिम आढावा घेतला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -